Mansoon Alert | घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा ; पुणे, सातारा, कोल्हापूरसह अनेक जिल्हे अलर्टवर

प्रभात वृत्तसेवा
पुणे – राज्यातील पावसाचा जोर ओसरत असला, तरी पुढील दोन ते तीन दिवस कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बऱ्याच ठिकाणी, तर विदर्भातील काही ठिकाणी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.नैऋत्य मौसमी पावसाचा (मान्सून) परतीचा प्रवास यंदा तीन दिवस आधीच सुरू झाला.
मात्र, मागील तीन ते चार दिवसांपासून परतीचा मान्सून स्थिर आहे, तर राज्यातही मागील चार ते पाच दिवस धो-धो पडलेल्या पावसाचा जोर हळूहळू कमी होऊ लागला आहे. मागील ४८ तासांत जिल्ह्यासह घाटमाथ्यावरील पावसाचा जोर ओसरला आहे. पुढील दोन ते तीन दिवस कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल.
दि. २२ सप्टेंबर रोजी पुणे जिल्ह्यातील घाट विभागात, तसेच कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतील घाट विभागासह जालना, हिंगोली, परभणी, नांदेड या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना ३० ते ४० ताशी वेगाने वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलका ते मध्यम सरी पडतील, तर सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव येथे मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार, तसेच विदर्भातील गडचिरोली आणि यवतमाळ येथे मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.





