Pune : लाडकी बहिण योजना सुरू केली त्यावेळी सरकारच्या तिजोरीत ‘पैसा’….; मंत्री रामदास आठवलेंचा सरकारला घरचा आहेर, नेमकं काय म्हणाले?

पुणे: विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. त्यानुसार राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील लाडक्या बहिणींना सरकारने दरमहा १५०० रुपये दिले. या योजनेचा मोठा फायदा महायुतीला निवडणकुीत झाला आणि सत्ता महायुतीला मिळाली.
सरकारी तिजोरीवर मोठा ताण येत असल्याने इतर योजनेचा लाभ घेणाऱ्या ५ लाख बहिणींना अपात्र ठरण्यात आले. या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या निकषात बदल करण्यात आले आहे. यामुळे फेब्रुवारी महिन्यात आणखी या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला अपात्र ठरणार असल्याची शक्यता आहे. आता यावर महायुतीमधीलच एका केंद्रीय राज्यमंत्र्यांनीच सरकारला घरचा आहेर दिला आहे.
राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेला सुरुवात केली. त्यावेळी सरकारच्या तिजोरीमध्ये निधी होता. मात्र, आता तिजोरीतील पैसे संपत चालले आहेत. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांना निकष लावण्यात येत असल्याचे मत सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. यामुळे महायुती सरकारमधीलच मंत्र्यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे उद्घाटन रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. यावेळी ते लाडकी बहिण योजनेवर बोलत होते.
फेब्रुवारीत चार लाख महिला अपात्र?
डिसेंबर महिन्यात लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या २ कोटी ४६ लाख होती. त्यापैकी आता सुमारे ५ लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यानुसार या योजनेचा लाभ घेणाऱ्या पात्र लाडक्या बहिणींची संख्या 2 कोटी 41 लाख झाली. तसेच फेब्रुवारीमध्ये सुमारे चार लाख महिलांना अपात्र घोषित केले जाण्याची शक्यता आहे.
त्यामुळे राज्य सरकारचे 945 कोटी रुपये वाचणार आहेत. या महिलांना लाडकी बहिण या योजनेतून केवळ 500 रुपये मिळतील, तर नमो शेतकरी योजनेतून 1000 रुपये मिळतील. ज्या वृद्ध महिला निवृत्तीवेत्तन म्हणजेच पेशनचा लाभ घेत आहेत, त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही.





