Border-Gavaskar Trophy 2024/25 : टीम इंडियासाठी मोठी खुशखबर..! रोहितसोबत ऑस्ट्रेलियाला जाणार ‘हा’ खेळाडू, थेट संघात होणार एंट्री?

Border-Gavaskar Trophy 2024/25 : बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-25 साठी उलटी गिनती सुरू झाली आहे. या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथे सुरुवात होणार आहे. रोहित शर्मा वगळता सर्वजण ऑस्ट्रेलियात असून या मालिकेसाठी जोरदार तयारी करत आहेत. खरंतर रोहितने दुस-या मुलाच्या जन्मासाठी टीम इंडियामधून ब्रेक घेतला होता. त्यांची पत्नी रितिका सजदेह हिने 15 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा मुलाला जन्म दिला. अशा परिस्थितीत रोहित शर्मा लवकरच ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. पण विशेष म्हणजे त्याच्यासोबत आणखी एक खेळाडू ऑस्ट्रेलियाला जाणार आहे, जो निवड झालेल्या संघाचा भाग नाही. या मालिकेदरम्यान या खेळाडूचा टीम इंडियात थेट समावेश होईल, असे मानले जात आहे.
दैनिक भास्करने आपल्या रिपोर्टमध्ये बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने दावा केला आहे की “रोहित शर्मा 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वीच भारतीय संघासोबत सामील होऊ शकतो. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीही रोहित शर्मासोबत बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी रवाना होऊ शकतो.”
बीसीसीआयकडून कोणतीही पुष्टी नाही
मात्र, इंडियन एक्सप्रेसने शमीचे बालपणीचे प्रशिक्षक मोहम्मद बदरुद्दीन यांचा हवाला देत आपल्या वृत्तात दावा केला आहे की, शमी दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर ऑस्ट्रेलियात भारतीय संघात सामील होईल. ब्रिस्बेनमधील तिसऱ्या कसोटीपासून तो संघात सामील होणार आहे. मात्र शमी ऑस्ट्रेलियाला जाण्याबाबत बीसीसीआयकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
गेल्या एक वर्षापासून टीम इंडियातून बाहेर
मोहम्मद शमीने गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषकाच्या फायनलनंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. जानेवारी 2023 मध्ये त्याच्या घोट्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यासाठी त्याला इंग्लंडला जावे लागले. यानंतर तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या पुनर्वसन शिबिराचा भाग होता.
रणजीमध्ये चमकदार कामगिरी…
अलीकडेच रणजी सामन्यातून तो पुन्हा एकदा मैदानात परतला. रणजी ट्रॉफीमध्ये मध्य प्रदेशविरुद्ध बंगाल संघाकडून खेळताना त्याने चमकदार कामगिरी केली . या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने 19 षटकात 54 धावा देत 4 विकेट घेतल्या, त्यानंतर दुसऱ्या डावातही शमीने 18 षटकात 102 धावा देत 3 बळी घेतले. याशिवाय त्याने दुसऱ्या डावात बॅटनेही अप्रतिम कामगिरी केली. त्याने 36 चेंडूत 37 धावांची खेळी केली.





