मोदी-फडणवीस-शिंदे-पवार यांचा मुखवटा घालून बांधल्या काळ्या राख्या; चौंडीत प्रहार जनशक्तीचा अनोखा निषेध

जामखेड : महाराष्ट्रात दररोज १० ते १५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असून, आतापर्यंत ६ लाख शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे जीवनयात्रा संपवली आहे. तरीही सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नसल्याचे म्हणत, प्रहार जनशक्ती पक्षाने शनिवारी (दि. ९ ऑगस्ट) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडी येथे अनोखे आंदोलन केले. रक्षाबंधनाच्या पवित्र सणादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मुखवट्यांना विधवा व निराधार महिलांनी काळ्या राख्या बांधून सरकारचा तीव्र निषेध केला.
प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी यावेळी सडेतोड टीका करताना म्हटले, “ही राखी नव्हे, तर शेतकऱ्यांच्या वेदनांचा धागा आहे. कमी हमीभाव आणि नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी जे आदर्श राज्य चालवले, ते मुख्यमंत्री फडणवीस यांना चालवता येते का? यासाठी आम्ही त्यांच्या जन्मभूमीत आलो आहोत.”
ते पुढे म्हणाले, “शक्तीपीठ महामार्गासाठी ८० हजार कोटी रुपये सहज मंजूर होतात, पण शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. लाडक्या बहिणींना पैसे देऊन भावांना लुटण्याचे काम हे सरकार करत आहे. अपंगांचे पगार चार-चार महिने थांबवले जातात, पण आमदार-खासदारांचे पगार कधीच थांबत नाहीत.”
या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी, उपाध्यक्ष जयसिंग उगले, तालुका अध्यक्ष नय्युमभाई सुभेदार, कर्जत तालुका अध्यक्ष सुदाम निकत, शेवगाव तालुका अध्यक्ष रामजी शिदोरे, महिला आघाडीच्या अध्यक्षा अनारसे ताई, जामखेड शहराध्यक्ष दिनेश राळेभात, दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पोकळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा लक्ष्मी देशमुख, युवक अध्यक्ष राहुल भालेराव, जवळा गट प्रमुख संगीता ढोले, जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम शिंगटे, स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, राष्ट्रीय समाज पक्ष तालुकाध्यक्ष डॉ. कारंडे, युवक उपाध्यक्ष विकास मासाळ, खर्डा गट प्रमुख बंडू उगले, शहर उपाध्यक्ष बबन घायतडक, शहर संघटक विकास राळेभात, सतीश राळेभात, संजय मोरे, शिवाजी भोसले, सोहेल तांबोळी यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष –
बच्चू कडू यांनी सरकारवर शेतकऱ्यांचे प्रश्न दुर्लक्षित केल्याचा आरोप केला. “दुष्काळापेक्षा जास्त चटके शेतीमालाला भाव नसल्याने बसत आहेत. अहिल्यादेवींचे विचार सरकारच्या डोक्यात शिरावेत, यासाठी आम्ही त्यांच्या समाधीस्थळी आलो आहोत,” असे त्यांनी ठणकावले.





