Jayakumar Gore : मंत्री जयकुमार गोरे यांनी रामराजेंना डिवचलं; म्हणाले… “मी देवेंद्र फडणवीसांचा पट्टा”

सोलापुर : मला किती ही चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न केला तरी आता अडकणार नाही. मी आधुनिक अभिमन्यू आहे. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पट्टा देखील आहे, असं म्हणत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांचे विरोधक रामराजे नाईक निंबाळकर यांना डिवचले आहे. सांगोला येथे जयकुमार गोरे यांचा सर्वपक्षीय नेत्यांनी नागरी सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी गोरे बोलत होते. (Jayakumar Gore)
या सत्कार कार्यक्रमाला शेकापसे विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजी बापू पाटील, ठाकरे गटाकडून निवडणूक लढविलेले माजी आमदार दीपक आबा साळुंखे , शेकाप नेते बाळासाहेब एरंडे आणि तालुक्यातील बहुतांश विविध पक्षांचे नेते या सोहळ्यासाठी उपस्थित होते.
काय म्हणाले जयकुमार गोरे
मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, मला किती ही चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न केला तरी आता अडकणार नाही. मी आधुनिक अभिमन्यू आहे. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पट्टा देखील आहे. सांगोल्याचे राजकारण सुसंस्कृत आहे. परंतु आमच्या जिल्ह्यात एकमेकांना जेलमध्ये घालण्याची स्पर्धा सुरू आहे. राजकारण हा सूड बुध्दीचा खेळ झालाय, असे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले, सांगोला तालुका याला अपवाद आहे. या तालुक्याला विचार आहे. ज्या विहीरीत पाणी नाही त्या विहीरित उडी मारू नका. देवा भाऊच्या विहिरीत पाणी आहे. तिकडेच उडी मारा, असे आवाहन करत शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख यांना भाजप सोबत येण्याची खुली ऑफर देखील जयकुमार गोरे यांनी यावेळी दिली. (minister jaykumar gore)
शहाजीबापू पाटील यांनी स्वतःच्या तोंडात घेतले मारून
माजी आमदार शहाजी पाटील म्हणाले, ज्यांनी आजवर सांगोल्याचे पाणी आडवायचे काम केले त्याला तुम्ही खासदार म्हणून पाठवले आणि ज्यांनी सगळ्यात जास्त पाण्याची कामे केली त्याला घरी बसवले. आपल्याला काहीतरी वाटायला पाहिजे, ही जनतेची माणूस म्हणून मोठी चूक आहे, आपण या चुकीबद्दल तोंडात मारून घ्यायला पाहिजे. असे म्हणत भरसभेत शहाजीबापू पाटील यांनी स्वतःच्या तोंडात मारून घेतले.
शहाजी बापू पाटील म्हणाले, आजवर सांगोल्याच्या पाण्यासाठी सर्वात मोठे काम निंबाळकर यांनी करूनही त्यांना घरी बसवले. मात्र, ज्यांनी पाणी अडवले त्यांना खासदार केले, ही बाब आपल्याला काळजात चर्र करणारी वाटली पाहिजे. त्या बिचार्या निंबाळकरांनी आज तुमचा हारही घेतला नाही, असे सांगत लोकसभेचा पराभव नक्कीच जिव्हारी लागला आहे, असं शहाजी बापू पाटील म्हणाले.





