Mhaswad News : अन् लाखो लिटर पाणी थेट रस्त्यावर! म्हसवडमध्ये नवीन पाणी योजनेचा फज्जा; पाहा काय घडलं?
Mhaswad News : केंद्र शासनाच्या २.० अंतर्गत मंजूर झालेल्या ८० कोटींच्या योजनेतील मुख्य पाईपलाईनला माळशिरस रस्त्यावर गळती; कामाच्या दर्जाबाबत नागरिकांमध्ये संशय.

Mhaswad News – शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावण्यासाठी केंद्र शासनाच्या २.० अंतर्गत सुरु असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असतानाच या योजनेच्या मुख्य पाइपलाइनला गळती लागली आहे. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून, कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी योजनेच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जलशुद्धीकरण केंद्रातून म्हसवड शहरातील मुख्य पाण्याच्या टाकीकडे येणाऱ्या नवीन पाइपलाइनमध्ये माळशिरस रस्त्यावरील कुस्ती केंद्र परिसरात गळती निर्माण झाली. या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले. सध्या शहरात आधीच पाण्याची टंचाई असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी १० ते १२ दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे.
अशा परिस्थितीत पाण्याचा अपव्यय होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. म्हसवड शहरासाठी अस्तित्वात असलेली जुनी जीवन प्राधिकरणाची योजना कालबाह्य झाल्यानंतर शहराच्या वाढत्या लोकसंख्येला आणि पाणी गरजेला न्याय देण्यासाठी नवीन योजना मंजूर करण्यात आली. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून केंद्र शासनाच्या २.० अंतर्गत सुमारे ८० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.
या योजनेमुळे शहराला भविष्यात नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली होती. पालिकेच्या निवडणुकीदरम्यानही शहराला २४ तास उपलब्ध पाणीपुरवठ्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांनी या योजनेकडून मोठ्या अपेक्षा बाळगल्या आहेत. मात्र, योजना सुरू होण्यापूर्वीच पाइपलाइनमध्ये तांत्रिक अडचणी, काही ठिकाणी गळती आणि पाइप फुटण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
लवकरच दुरुस्ती पूर्ण होईल…
“दोन पाइपमधील रिंग सटकल्यामुळे मुख्य लाइनमध्ये गळती झाली आहे. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच काम पूर्ण करून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल,” असे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी सांगितले.





