Nagar | म्हाळुंगी पुलाच्या कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही

संगमनेर : – स्वामी समर्थ मंदिर ते साईबाबा मंदिर या म्हाळुंगी नदीवरील पुलाचे काम धिम्या गतीने चालू आहे. या पुलासाठी महायुती सरकारने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलेला आहे. निधीची काळजी करू नका, त्यामुळे लवकरात लवकर काम पूर्ण करा. कामामध्ये कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, अशी तंबी आ.अमोल खताळ पाटील यांनी ठेकेदारांना दिली.
संगमनेर शहरातील स्वामी समर्थ मंदिर ते साईबाबा मंदिर या परिसरात असणारा म्हाळुंगी नदीवरील पूल कोसळला होता. त्यामुळे या परिसरातील नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते.त्यामुळे या पुलासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून निधी मंजूर करण्यात आला आहे. या पुलाचे काम सुरू होऊन अनेक दिवस लोटले आहे मात्र हे काम अगदी धिम्या गतीने चालू असल्याचे शिवसेनेचे आ. खताळ यांच्या निदर्शनास आले.
आ. खताळ यांनी म्हाळुंगी नदीवरील पुलाच्या कामाची पाहणी करत पुलाच्या कामाच्या संदर्भात आढावा घेतला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता शाम मिसाळ, मुख्याधिकारी रामदास कोकरे, अभियंता पंकज मुंगसे आणि ठेकेदार कैलास राऊत या सर्वांनी सुरू असलेल्या कामाची माहिती आमदार खताळ यांना दिली. त्यानंतर काम एकदम धिम्या गतीने चालू आहे, ढिलाईपणा करू नका, निधीबाबतअजिबात काळजी करू नका, या कामात कुठल्याही प्रकारचा ढिलाईपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा दिला.
यावेळी जनसंपर्क अधिकारी प्रमोद राहणे ,भाजप शहरप्रमुख ॲड. श्रीराम गणपुले, शिवसेना तालुकाध्यक्ष रामभाऊ राहणे, शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी, माजी नगरसेवक जावेद जागीरदार, रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष कैलास कासार, माजी नगरसेवक अविनाश थोरात, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष शशांक नामन, योगीराज परदेशी, अतुल कासट, संदेश देशमुख, सुयोग गुंजाळ, रौफ शेख यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





