MCA denies Rohit Sharma participation confirmation : बीसीसीआयने टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासाठी कठोर भूमिका घेतली आहे. या दोन्ही खेळाडूंना जर आगामी २०२७ च्या विश्वचषकावर लक्ष केंद्रित करायचे असेल आणि एकदिवसीय (ODI) संघात आपले स्थान कायम ठेवायचे असेल, तर त्यांनी आधी देशांतर्गत स्पर्धा विजय हजारे ट्रॉफी मध्ये खेळणे अनिवार्य आहे, असे स्पष्ट निर्देश बीसीसीआयने दिले आहेत. या निर्देशानंतर एका वृत्तात दावा करण्यात आला होता की, रोहितने स्पर्धेत खेळण्यास सहमती दर्शवली असून त्याने एमसीए याची माहिती दिली आहे. मात्र, या बाबत आता एमसीएने वेगळाच खुलासा केला. रोहित शर्माच्या सहमतीवर संभ्रम मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (MCA) मुख्य निवडकर्ता संजय पाटील यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या माहितीत हा दावा फेटाळून लावला आहे. पाटील म्हणाले, “मला रोहित शर्माकडून अद्याप कोणताही संपर्क करण्यात आलेला नाही. जर तो मुंबईकडून खेळला तर ते आमच्यासाठी खूप चांगलेच असेल. त्याचा संघातील समावेश तरुण खेळाडूंसाठी खूप उपयुक्त ठरू शकेल. बीसीसीआय, अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांनी हे खूप चांगले पाऊल उचलले आहे.” वाढते वय आणि कामगिरीची चिंता – रोहित शर्माने ऑस्ट्रेलियातील एकदिवसीय मालिकेत भारतीय संघात पुनरागमन केले आहे आणि तो २०२७ च्या विश्वचषकावर लक्ष केंद्रित करत असल्याचे त्याने यापूर्वीही अनेकदा सांगितले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रोहितने सर्वाधिक धावा केल्या होत्या, तसेच तीन सामन्यांच्या मालिकेत शतक ठोकणारा तो एकमेव फलंदाज होता, ज्यामुळे तो फॉर्ममध्ये असल्याचे सिद्ध झाले. हेही वाचा – IPL Trade Window : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सची साथ सोडणार, ‘या’ संघासोबत होणार मोठी ट्रेड डील परंतु, बीसीसीआय आणि सध्याचे संघ व्यवस्थापन रोहितचे वाढते वय आणि अलिकडच्या काही सामन्यांतील साधारण कामगिरी यामुळे त्याच्या फिटनेस आणि फॉर्मबद्दल साशंक आहेत. म्हणूनच, त्याला आणि विराट कोहलीला सामन्यांसाठी तंदुरुस्त राहण्यासाठी स्थानिक क्रिकेट खेळण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. हेही वाचा – IND vs SA : ‘भारताला त्यांच्या घरात पराभूत करण्यासाठी उत्सुक…’, मालिकेपूर्वी आफ्रिकन खेळाडूचं मोठं वक्तव्य पुढील स्पर्धांचा पेच – रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळणार की नाही, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. ही स्पर्धा २४ डिसेंबर ते ११ जानेवारी २०२६ पर्यंत चालणार आहे. या स्पर्धेचा ३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेवर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र, २६ नोव्हेंबरपासून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सुरू होत आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेआधी या दोघांना त्या स्पर्धेत खेळण्यास सांगितले जाणार का, याकडे आता क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.