मायावतींची मोठी घोषणा ! महाराष्ट्र, झारखंड निवडणूक स्वबळावर लढणार

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची १५ ऑक्टोबरला घोषणा झाली. राज्यात २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. त्याशिवाय निकाल २३ नोव्हेंबरला समोर येईल. दरम्यान राज्यभरात अनेक राजकीय घडामोडी घडतील, अशी शक्यता आहे. त्यातच बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावतींनी मोठी घोषणा केली आहे.
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये बसपा स्वबळावर निवडणूक लढवेल, असे त्यांनी ट्विटमध्ये जाहीर केलं आहे. याचा अर्थ मायावती महायुती किंवा महाविकासआघाडीत सामील होणार नाहीत, असे मायावतींनी सांगितले. बसपा प्रमुख मायावती यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. बसपा या दोन राज्यांमध्ये (महाराष्ट्र आणि झारखंड) स्वबळावर निवडणूक लढवणार आहे.
बसपातील लोक इतके तिकडे न भटकता पूर्णपणे बसपाशी प्रामाणिक राहतील आणि परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आत्मसन्मान आणि स्वाभिमानाचा मान ठेवतील. शिवाय सत्तेत येण्यासाठी आपले प्रयत्न सुरू ठेवतील. बसपा या दोन राज्यात स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. महाराष्ट्रात एकेकाळी बसपाची चांगली ताकद होती. पूर्व विदर्भात बसपा राजकीय ताकद बाळगून होता. अलीकडे ही ताकद घसरली असली तरी बसपच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीची काही मते जाण्याची शक्यता आहे.





