Mawal Rain Update: निसर्गाचे चक्र बिघडले! पेरणीचा काळ आला, पण शेतशिवारात शुभ संकेत देणारा ‘हा’ किडा का दिसेना?
Mawal Rain Update: ग्रामीण संस्कृतीशी जोडलेले भावनिक नाते तुटण्याच्या मार्गावर; निसर्गातील बदलांवर मावळातील शेतशिवारात मोठी चर्चा.

Mawal Rain Update – जून महिना संपत आला तरी मावळ तालुक्यात समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पावसाच्या आगमनाची पारंपरिक चाहूल मानला जाणारा लाल मखमली ‘मृग किडा’ यंदा अद्यापही दिसलेला नाही. मृग नक्षत्राचा कालावधी समाप्त झाला तरीही या किड्याचे दर्शन न झाल्याने शेतकरी आणि निसर्गप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मावळ तालुका हा डोंगरदऱ्या, नद्या आणि समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखला जातो.
येथील ग्रामीण भागात निसर्गाच्या खुणांवरून हवामानाचा अंदाज बांधण्याची परंपरा आजही जपली जाते. त्यामध्ये ‘मृग किडा’ हा पावसाच्या आगमनाचा महत्त्वाचा संकेत मानला जातो. पहिल्या पावसाच्या सरी कोसळल्यानंतर जमिनीतून बाहेर येणारा हा लाल मखमली किडा शेतकऱ्यांसाठी आश्वासक चिन्ह समजला जातो. मात्र यंदा चित्र पूर्णपणे वेगळे आहे. पाऊस उशिरा दाखल झाला आहे. त्यानंतर देखील पावसाला जोर नसल्याने अद्याप शेतीची कामे सुरू झाली नाहीत.
वातावरणात अपेक्षित आर्द्रता निर्माण झालेली नाही. परिणामी मृग किड्याचे दर्शनही घडलेले नाही. गावोगावी, वाड्या-वस्त्यांवर आणि शेतशिवारात याच विषयाची चर्चा सुरू आहे. जुन्या पिढीतील शेतकरी सांगतात की, मृग नक्षत्राच्या सुरुवातीला हा किडा मोठ्या प्रमाणावर दिसायचा. शेतातील बांध, डोंगर उतार आणि मोकळ्या जमिनीवर लाल रंगाचे हे किडे फिरताना सहज पाहायला मिळत असत. या किड्याचे दर्शन म्हणजे चांगल्या पावसाचे संकेत मानले जात होते.
त्यामुळे शेतकरी पेरणीच्या तयारीलाही वेग देत असत. यंदा मात्र पावसाच्या लहरीपणामुळे संपूर्ण नैसर्गिक चक्रावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. वाढते तापमान, बदलती हवामान परिस्थिती आणि जमिनीतील घटलेली आर्द्रता याचा परिणाम या सूक्ष्म जीवांवर होत असल्याचे पर्यावरण अभ्यासकांचे मत आहे. रासायनिक खतांचा वाढता वापर, कीटकनाशकांची फवारणी आणि नैसर्गिक अधिवासात होत असलेले बदल यामुळेही या किड्यांची संख्या कमी होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
निसर्गाशी जोडलेले सांस्कृतिक नाते
मृग किडा हा केवळ एक जीव नाही. तो ग्रामीण संस्कृतीचा भाग आहे. मावळातील अनेक गावांमध्ये या किड्याशी भावनिक नाते जोडलेले आहे. पहिल्या पावसानंतर या लाल मखमली किड्याचे दर्शन झाले की शेतकरी आनंद व्यक्त करतात. काही ठिकाणी या किड्याला हळद-कुंकू वाहण्याची आणि त्याचे स्वागत करण्याची परंपरा आजही जपली जाते. ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या मते, निसर्गातील प्रत्येक जीवाचे एक महत्त्व असते. मृग किडा दिसणे म्हणजे जमिनीतील ओलावा वाढल्याचा आणि शेतीसाठी पोषक वातावरण तयार झाल्याचा संकेत मानला जातो. त्यामुळे या किड्याच्या अनुपस्थितीने अनेकांना निसर्गातील बदलांची चिंता वाटू लागली आहे.





