Sangli News : दारातील ‘नंदी’ झाला दुर्मिळ! 18 वर्षांपासून परंपरा जपणारे बारामतीचे गदाई कुटुंब शिराळ्यात दाखल
पिढ्यानपिढ्या चालत आलेली आणि गावोगावी पोटासाठी फिरणाऱ्या नंदीबैलांची पारंपरिक लोकसंस्कृती (Sangli News)आता आधुनिकतेच्या प्रवाहात हद्दपार होऊ लागली आहे.

Sangli News : पिढ्यानपिढ्या चालत आलेली आणि गावोगावी पोटासाठी फिरणाऱ्या नंदीबैलांची पारंपरिक लोकसंस्कृती (Sangli News)आता आधुनिकतेच्या प्रवाहात हद्दपार होऊ लागली आहे. ही ग्रामीण संस्कृती जीवंत ठेवण्यासाठी नागरिकांनी नंदीबैलाला धान्य आणि दक्षिणा देऊन या परंपरेला पाठबळ द्यावे, असे भावनिक आवाहन नंदीबैलाचे मालक तानाजी गदाई (जळोची, ता. बारामती) यांनी केले आहे.
सध्या शिराळा तालुक्यातील आरळा आणि शित्तूर वारूण परिसरात या नंदीबैलाचे आगमन झाले असून, त्याला पाहण्यासाठी शाळकरी मुलांची मोठी गर्दी होत आहे.
लोकसंस्कृतीतील नंदीबैलाचे महत्त्व
नंदीबैल हा महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा आणि हिंदू परंपरेचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. भगवान शिवाचे वाहन असल्यामुळे समाजात त्याला विशेष आदराचे स्थान आहे. पूर्वीच्या काळी खेडोपाड्यात जेव्हा लोककलाकार नंदीबैलाला आकर्षकपणे सजवून आणायचे, तेव्हा ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत केले जायचे.
मालकाने विचारलेल्या प्रश्नांवर नंदीबैल हो किंवा नाही अशा पद्धतीने आपली मान डोलावत असे. हे दृश्य अबालवृद्धांसह लहान मुलांसाठी मनोरंजनाचा मुख्य स्त्रोत असायचे. नंदी दारात आल्यावर सुवासिनी महिला त्याचे हळद-कुंकू लावून औक्षण करायच्या आणि दर्शन घ्यायच्या. मात्र, गेल्या दहा वर्षांत गावोगावी नंदीबैलाचे दर्शन होणे अत्यंत दुर्मिळ झाले आहे.
१८ वर्षांची जिवापाड माया आणि प्रशिक्षण
बारामती तालुक्यातील जळोची येथील रहिवासी असलेले तानाजी गदाई हे कुटुंब आपली कौटुंबिक परंपरा टिकवण्यासाठी आणि पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नंदीला घेऊन दारोदारी फिरत आहे. गेल्या १८ वर्षांपासून त्यांनी या नंदीला आपल्या मुलाप्रमाणे जिवापाड जोपासले आहे. लहानपणापासूनच त्याला विशेष प्रशिक्षण देण्यात आल्यामुळे, मालकाने विचारलेल्या प्रश्नांवर तो अचूक मान डोलावतो.
या प्रवासात तानाजी गदाई यांच्यासोबत सिद्धार्थ वाकुडे हेदेखील संस्कृती रक्षणासाठी आणि मनोरंजनासाठी सोबत असतात. ही प्राचीन परंपरा आणि महाराष्ट्राचे वैभव पुढील पिढीसाठी टिकवून ठेवायचे असेल, तर समाजाने नंदीबैलाला सढळ हाताने मदत करणे गरजेचे असल्याचे मत गदाई यांनी व्यक्त केले.






