Maval Tourism – मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानात लक्षणीय वाढ होत असून दुपारच्या सत्रात उष्णतेचा चटका जाणवू लागला आहे. अद्याप शाळा-महाविद्यालयांच्या वार्षिक परीक्षा सुरू असल्याने सुट्ट्यांचा हंगाम सुरू झालेला नसला, तरीही आठवड्याच्या शेवटी मावळ तालुक्यातील जलपर्यटन स्थळांकडे पर्यटकांचा ओघ वाढताना दिसत आहे. पुणे, मुंबई, पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील नागरिक विशेषतः शनिवार-रविवारी मावळकडे वळत आहेत. पवना, भुशी धरण परिसर तसेच लोणावळा परिसरातील विविध रिसॉर्ट्स आणि वॉटरपार्क यारख्या ठिकाणी सकाळपासूनच पर्यटकांची वर्दळ वाढलेली दिसून येते. पर्यटकांच्या वाढत्या वर्दळीमुळे स्थानिक अर्थचक्राला गती मिळत आहे. खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, चहाच्या टपऱ्या, वाहन पार्किंग सेवा, मार्गदर्शक आणि स्थानिक व्यावसायिकांना अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे. ग्रामीण भागातील युवकांनी पर्यटनाशी संबंधित लघुउद्योग सुरू केले असून बोटिंग आणि कॅम्पिंग व्यवस्थापन आदी माध्यमातून रोजगारनिर्मिती होत आहे. परीक्षेनंतर आणि मार्चअखेर सुट्ट्या सुरू झाल्यानंतर या उलाढालीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विकेंडच्या दिवशी मावळकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतुकीचा ताण वाढतो आहे. काही ठिकाणी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांकडून नियोजन केले जात आहे. पर्यटकांच्या वाढत्या उपस्थितीमुळे स्वच्छतेचाही प्रश्न निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पवना धरण पवना धरण परिसर ठरतोय प्रमुख आकर्षण मावळ तालुक्यातील पवना धरण परिसर हा जलपर्यटनासाठी प्रमुख आकर्षण ठरत आहे. तलावाच्या काठावर उभारण्यात आलेल्या कॅम्पिंग साइट्स, बोटिंग सुविधा आणि विविध उपक्रमांमुळे पर्यटकांचा प्रतिसाद वाढत आहे. सध्या परीक्षा काळ असल्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वर्ग उपस्थित नसला, तरीही कामकाजाच्या धावपळीमधून विश्रांती घेण्यासाठी तरुण आणि कुटुंबीय येथे येत असल्याचे चित्र आहे. शनिवार-रविवारी सकाळपासूनच तलाव परिसरात वाहनांची संख्या वाढते. बोटिंग आणि स्पीड बोटिंगसारख्या उपक्रमांना तरुणांची मागणी आहे. काही ठिकाणी दिवसाचे पॅकेज तसेच संध्याकाळी सूर्यास्त दर्शनाची विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. भुशी धरण परिसरात गर्दी भुशी धरण परिसरात पावसाळ्याइतकी गर्दी नसली तरी वाढत्या तापमानामुळे येथे पर्यटकांची संख्या वाढली आहे. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी नागरिक आणि पर्यटक याठिकाणी वेळ घालवत असल्याचे दिसते. शैक्षणिक परीक्षा सुरू असल्यामुळे कुटुंबीयांचे छोटे गट, मित्रपरिवार किंवा कामकाजानिमित्त आठवड्यातील ताण हलका करण्यासाठी येणारे पर्यटक यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे पर्यटनाची गती मर्यादित असली तरी सातत्यपूर्ण वाढ दिसून येते. आगामी पर्यटन हंगामाची चाहूल सध्या परीक्षा काळामुळे पर्यटनाची गती मर्यादित असली तरी वाढते तापमान आणि उन्हाळ्याची सुरूवात लक्षात घेता पुढील काही आठवड्यांत पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मार्चअखेर परीक्षा संपल्यानंतर कुटुंबीयांसह सहलींचे प्रमाण वाढेल, असा अंदाज स्थानिक व्यावसायिकांकडून व्यक्त केला जात आहे.