Maval Tourism: ६ महिने पाण्यात, ६ महिने बाहेर! सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मावळातील ‘या’ रहस्यमयी मंदिराची सत्यकथा
Maval Tourism: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हेमाडपंती मंदिर; ६० वर्षांनंतर भाविकांना लाभले थेट गाभाऱ्यातील दर्शन.
Maval Tourism – ऐतिहासिक वारसा आणि निसर्गसौंदर्याचा अनोखा संगम लाभलेल्या पवन मावळ परिसरातील श्री वाघेश्वर मंदिर सध्या भाविकांसह पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. पवना धरणाच्या बॅकवॉटरमध्ये वसलेले हे प्राचीन मंदिर वर्षातील सहा महिने पाण्याखाली आणि सहा महिने पाण्याबाहेर राहते, हेच त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य असून सोशल मीडियावर मंदिराचे फोटो आणि रील्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. पवना धरणातील पाणीसाठा कमी झाल्यानंतर या ऐतिहासिक मंदिराचे अवशेष आणि गाभारा भाविकांच्या दर्शनासाठी खुले होतात.
संथ जलाशयात मंदिराचे आणि सभोवतालच्या डोंगररांगांचे पडणारे प्रतिबिंब पर्यटकांना मंत्रमुग्ध करते. विशेषतः सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी येथे अनुभवायला मिळणारे दृश्य छायाचित्रकार आणि निसर्गप्रेमींसाठी पर्वणी ठरत आहे. सुमारे ६० बाय ४० फूट आकाराच्या या दगडी मंदिराचा सध्या फक्त गाभारा शिल्लक असला, तरी मंदिरातील ऐतिहासिक सुमारे १०० किलो वजनाची पंचधातूची घंटा वाघेश्वरच्या ग्रामस्थांनी आजही सुरक्षित जतन करून ठेवली आहे.
इतिहासकारांच्या मते, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तिकोणा आणि तुंग किल्ल्यावर जात असताना आवर्जून वाघेश्वर मंदिरात दर्शनासाठी येत असत. मंदिराच्या देखभालीची जबाबदारीही त्यांनी स्थानिक सरदारांकडे सोपवली होती. पूर्वी या मंदिराला हेमाडपंती मंदिर म्हणून ओळखले जात असे. तर स्थानिक आख्यायिकेनुसार, अजिवलीच्या गुहेत राहणाऱ्या एका ऋषींच्या सांगण्यावरून एका गुराख्याने गायीचा पाठलाग केला असता ती एका ठिकाणी उभी राहून स्वतःहून दुधाचा अभिषेक करत असल्याचे दिसून आले. त्याच ठिकाणी स्वयंभू शंकराची पिंड प्रकट झाली आणि पुढे या मंदिराला व्याघ्रेश्वर अर्थात वाघेश्वर हे नाव प्राप्त झाले.
६० वर्षांनंतर लाभले श्रावणी सोमवारचे दर्शन
१९६५ मध्ये पवना धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि १९७१ मध्ये धरण पूर्ण भरल्यानंतर हे ऐतिहासिक मंदिर जलाशयाखाली गेले. त्यानंतर ग्रामस्थांनी गावाजवळ मंदिराची प्रतिकृती उभारली. मात्र, २०२० मध्ये श्रावण महिन्यात पाऊस कमी झाल्यामुळे तब्बल ६० वर्षांनंतर प्रथमच मूळ मंदिर पाण्याखाली गेले नाही आणि भाविकांना श्रावणी सोमवारच्या दिवशी थेट मूळ गाभाऱ्यात दर्शन घेण्याची संधी मिळाली.
“हे मंदिर प्राचीन इतिहासाची साक्ष देणारे आहे. पुरातत्त्व विभाग आणि राज्य शासनाने याची योग्य दुरुस्ती करून हा अनमोल ठेवा जतन करावा. तसेच येथे वाढणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षात घेऊन मंदिराचा जीर्णोद्धार आणि तेथे जाण्यासाठी चांगल्या रस्त्याची उभारणी करणे अत्यंत गरजेचे आहे.”
– नितीन लायगुडे, माजी सरपंच






