वडगाव मावळ – राज्य शासनाने पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पावरील स्तगिती हटविल्याने राज्य शासनाच्या निषेधार्थ मावळतील सर्वपक्ष एकवटले असून शुक्रवारी (दि.15) सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने वडगाव येथील श्री पोटोबा महाराज मंदिरापासून तहशील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. तहसीलदार विक्रम देशमुख यांनी हे निवेदन स्विकारले.
यावेळी आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, माजी मंत्री मदन बाफना, गणेश खांडगे, रवींद्र भेगडे, रामदास काकडे, गणेश भेगडे, किशोर भेगडे, रुपेश म्हाळसकर, एकनाथ टीळे, ज्ञानेस्वर दळवी, भारत ठाकूर, सूर्यकांत वाघमारे, गुलाब म्हाळसकर, आनंता कुडे, मचिंद्र खराडे, यशवंत मोहोळ ,सायली बोत्रे, प्रतिमा हीरे, भाई मोरे आदींसह सर्व पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
आमदार सुनील शेळके म्हणाले की, मावळ तालुक्यातील शेतकरी जो निर्णय घेईल त्या निर्णयाशी मी बांधील आहे. पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प रद्द झालाच पाहिजे. माझा नेता जरी पाईपलाईन चालू करायला आला, तरी मी माझ्या पदाचस राजीनामा देईन,असा शब्द आमदार सुनील शेळके यांनी शेतकऱ्यांना त्यांना दिला आहे. तसेच आम्ही असताना तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ यावी, हा आमचा लोकप्रतिनिधी म्हणून कमीपणा आहे. यामुळे तुमच्यावर आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार नाही. पक्ष बदलला म्हणजे तत्व बदललेली नाहीत. यामुळे बंद पाइप लाइन प्रकल्प होईल असे कुणीही स्वप्नात देखील आणू नका, ही सर्वस्वी जबाबदारी आमची असेल.
राज्यमंत्री बाळा भेगडे म्हणाले की, 9 ऑगस्ट 2011 ला मावळ तालुका भारतीय जनता पार्टी, भारतीय किसान संघ, कॉंग्रेस, शिवसेना, आरपीआय या सर्व पक्षांच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड बंद जलवाहिनीच्या विरोधात मावळ बंद व रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात जगाच्या इतिहासात शेतकऱ्यांवर करण्यात आलेला गोळीबाराची दुर्दैवी घटना घडली. त्यामध्ये तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तर गोळ्या लागून अनेकजण गंभीररित्या जखमी झाले. या घटनेची संपूर्ण देशात दखल घेण्यात आली आणि सगळीकड़े तत्कालीन राज्य सरकारच्या या आडमुठ्या धोरणाचा जाहिर निषेध करण्यात आला.
तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या बंद जलवाहिनी प्रकल्पाला स्थगिती देण्याचे आदेश दिले. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून होणारी ही योजना या ठिकाणच्या शेतकरी व संघटनाना कधीही विश्वासात न घेता पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
पुन्हा रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत
मावळ तालुक्यातील शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरून या बंद जल वाहिनीच्या विरोधात आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत. या प्रकल्पास सर्व पक्षांचा विरोध असून तो कायमस्वरूपी रद्द करावा अशी मागणी यावेळी तहसीलदार विक्रम देशमुख यांच्याकडे करण्यात आली.