Maval political shift | मावळ कॉंग्रेसला मोठा धक्का ; काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

प्रभात वृत्तसेवा
वडगाव मावळ – सध्या राज्यभरात निवडणुकीचे वारे चांगलेच वाहू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकारणात मोठी महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामदास काकडे, पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती बाबुराव वायकर यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील अनेक कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. १५) कमळ हाती घेतले.
कमळ हाच विजयाचा मार्ग, असे सांगत शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान तालुक्यातील ज्येष्ठ नेते बापूसाहेब भेगडे यांचा भाजप प्रवेश होणार असल्याची चर्चा सुरू आहे, पण सोमवारी झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात ते अनुपस्थित राहिल्याने त्यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. या मोठ्या प्रवेशामुळे आगामी निवडणुकांवर परिणाम होणार असल्याचे सांगितले जात आहे.
भारतीय जनता पक्षात प्रवेश मुंबई येथील पक्षकार्यालयात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला. या प्रवेशामुळे तालुक्यातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे. यावेळी मावळचे माजी मंत्री बाळा भेगडे, तसेच महाराष्ट्र प्रदेश किसान संघाचे अध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद, माजी तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, तालुक्यातील मंडल अध्यक्ष यांच्यासह मावळ तालुक्यातील पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रवेश करणारे प्रमुख नेते..
पक्षातील प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उद्योजक व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामदास काकडे, पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती बाबुराव वायकर, माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे, सुभाष जाधव, सचिन घोटकुले, संतोष मुऱ्हे, शिवाजी असवले, अतिष परदेशी, संग्राम काकडे, तुषार भेगडे, अरुण माने, अरुण चव्हाण यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. यावेळी कार्यकर्त्यांनी “कमळ हाच विजयाचा मार्ग” अशा घोषणा देत भाजपच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त केला. पक्षनेत्यांकडून सर्वांचे स्वागत करताना, “आगामी निवडणुकांत भाजपची ताकद मावळ तालुक्यात आणखी वाढणार” असा विश्वास देखिल व्यक्त करण्यात आला. या पक्षप्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
आपण ठेवलेला विश्वास सार्थ ठरवू..
भाजपाच्या विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवून या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपावर ठेवलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवू, अशी ग्वाही प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली. भाजपाची विचारधारा ही व्यक्तिनिष्ठ नसून प्रत्येक कार्यकर्ता पक्षाच्या विचारधारेसोबत काम करतो आणि हाच विचार आपल्याला विजयाकडे नेतो. “जे प्रश्न घेऊन याल ते सोडवले जातील आणि पक्ष तुमच्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील,” असे देखिल चव्हाण यांनी स्पष्ट केले. ही विचारधारा तळागाळात पोहोचवण्यासाठी सर्वांनी ताकद लावावी, असे आवाहनही यावेळी करण्यात, सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आम्ही काम करण्याचा शब्द किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी यावेळी दिला.
बापूसाहेब भेगडे यांचा प्रवेश अजूनही चर्चेत..
बाहेरगावी असल्याने बापूसाहेब भेगडे पक्षप्रवेश सोहळ्यात सहभागी झाले नाही. मात्र त्यांच्या समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून लवकरच भेगडे यांचा आणि इतर कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा होणार असल्याचे सांगण्यात आले. तरीही बापूसाहेब भेगडे यांचा पक्षप्रवेश अद्याप गुलदस्त्यात आहे, हे मात्र निश्चित.





