Maoists Surrender : केंद्र सरकारने दिलेल्या ३१ मार्चच्या अंतिम मुदतीपूर्वी शनिवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांच्यासमोर 130 माओवाद्यांनी आत्मसमर्पण (Maoists Surrender) केले आहे. आत्मसमर्पण करत माओवाद्यांनी १२४ बंदुका सोपवल्या आहेत, यामध्ये एके-४७ रायफल्ससह विविध कॅलिबरचे ५,२०० हून अधिक जिवंत काडतुसे सोपवली आहेत. डीजीपी बी शिवधर रेड्डी यांनी सांगितले की, आत्मसमर्पण (Maoists Surrender) केलेल्या माओवाद्यांपैकी १२५ छत्तीसगडचे, ४ तेलंगणाचे आणि १ आंध्र प्रदेशचा आहे. आता तेलंगणा राज्य माओवाद्यांची समिती नाही. ती पूर्णपणे गायब झाली आहे. आत्मसमर्पण केल्याने या प्रदेशातील सीपीआय (माओवादी) ची ऑपरेशनल आणि लढाऊ क्षमता लक्षणीयरीत्या कमकुवत झाली आहे. सेंट्रल रीजनल ब्युरो (सीआरबी) क्षेत्रातील दीर्घकाळ चाललेल्या बंडखोरीचा अंत झाला आहे. आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांनी प्रतीकात्मकपणे त्यांची शस्त्रे मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केली. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी भूमिगत माओवाद्यांना मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आवाहन करताना सांगितले की, जानेवारी २०२४ पासून तेलंगणामध्ये ७२१ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. केंद्र सरकारने तेलंगणाला आत्मसमर्पण केलेल्यांना आरोग्यसेवा, आर्थिक मदत दिली आहे. मी भूमिगत असलेल्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन करत आहे. सार्वजनिक जीवनाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हा आणि तेलंगणाच्या पुनर्बांधणीत भागीदार व्हा. काँग्रेस सरकार नक्षलवाद्यांबद्दल सहानुभूतीशील आणि सकारात्मक आहे. आवश्यक असल्यास माओवाद्यांविरुद्ध प्रलंबित खटल्यांचा आढावा घेण्यासाठी आणि कायद्याच्या मर्यादेत माघार घेण्याची शक्यता तपासण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल, असे ते म्हणाले.