Manoj Tiwari : भाजपाचे खासदार मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांच्या ताफ्यातील पोलिस एस्कॉर्ट वाहनाने एका रिक्षाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षातील पाच प्रवासी जखमी झाले असून, त्यांना तातडीने जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात जळगाव शहरातील मेहरून तलावाजवळ घडला. मनोज तिवारी हे पारोळा येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी आले होते. त्यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा असल्याने जळगाव जिल्हा पोलिसांनी एस्कॉर्ट वाहनाची व्यवस्था केली होती. manoj tiwari कार्यक्रम संपल्यानंतर मनोज तिवारी यांना संभाजीनगरच्या हद्दीत सोडून पोलिसांचे एस्कॉर्ट वाहन जळगावकडे परत येत होते. त्याचवेळी रस्त्यावरील खड्डा चुकवताना वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि एस्कॉर्ट वाहन रिक्षाला जोरदार धडकले. धडकेमुळे रिक्षा मातीच्या ढिगाऱ्यावरून उडून गेली आणि रस्त्यावर पडली. रिक्षाचा पूर्णपणे चक्काचूर झाला असून, पोलिसांच्या एस्कॉर्ट वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातात रिक्षातील पाच प्रवासी जखमी झाले. जखमींनी रुग्णालयात सांगितले की, रस्त्यातील खड्ड्यांमुळे हा अपघात झाला. खड्डा टाळण्यासाठी वाहन चालकाने अचानक ब्रेक मारले आणि नियंत्रण सुटले. जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या घटनेची माहिती दिली. ते म्हणाले, “मनोज तिवारी यांना वाय प्लस सुरक्षा असल्याने एस्कॉर्ट वाहनाची व्यवस्था केली होती. ते वाहन परत येत असताना हा अपघात झाला. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे आणि उपचार सुरू आहेत.” पोलिसांनी अपघातस्थळी पाहणी केली असून, रस्त्यावरील खड्डे आणि वाहन चालकाच्या नियंत्रण सुटण्याच्या कारणांचा तपास सुरू आहे. या अपघातामुळे जळगाव शहरातील वाहतूक आणि रस्त्यांच्या स्थितीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.