Manoj Jarange Patil – ‘शिवगर्जना’ महानाट्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेमागील उद्देश, लोकाभिमुख प्रशासन आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी केलेला संघर्ष प्रभावीपणे दाखविण्यात येत आहे. आजच्या काळात इतिहास केवळ लक्षात ठेवण्याचा विषय राहिलेला नाही, तर त्यातून प्रेरणा घेऊन सामाजिक बांधिलकी जपण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य उभे करताना न्याय, समता आणि कष्टकऱ्यांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवले होते. हीच भूमिका आजच्या तरुणांनी स्वीकारली, तर समाजात सकारात्मक बदल घडू शकतो. युवकांमध्ये राष्ट्राभिमान जागवण्याबरोबरच समाजासाठी काहीतरी करण्याची जाणीव निर्माण करण्याची ताकद या महानाट्याच्या सादरीकरणात आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘विचार प्रबोधन पर्वा’अंतर्गत सादर करण्यात आलेल्या ‘शिवगर्जना’ या भव्य महानाट्याचा दुसरा प्रयोग बुधवारी (दि. १८) निगडी येथील नियोजित महापौर निवास परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला. या महानाट्यास मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित राहून संपूर्ण महानाट्य पाहिले, त्यावेळी ते बोलत होते. शिवगर्जना महानाट्याद्वारे ऐतिहासिक घटनांवर आधारित प्रसंगांचे प्रभावी सादरीकरण, भव्य नेपथ्यरचना, पारंपरिक वेशभूषा आणि आधुनिक तांत्रिक साधनांच्या सहाय्याने उभारण्यात आलेल्या दृश्यांमुळे उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. सादरीकरणादरम्यान अनेक प्रसंगांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद देत टाळ्यांचा कडकडाट केला. या महानाट्यातून स्वराज्य स्थापनेचा संघर्ष, किल्ल्यांच्या लढाया, आरमार उभारणी तसेच शिवकालीन प्रशासन व्यवस्थेचे विविध पैलू नाट्यमय पद्धतीने उलगडण्यात आले. कलाकारांच्या जिवंत अभिनयातून साकारलेल्या प्रसंगांमुळे इतिहासाचा थरार अनुभवण्याची संधी उपस्थितांना मिळाली.