Manoj Jarange : मनोज जरांगेंची तब्येत खालावली; महिलांचा आक्रोश, अश्रू अनावर, अंतरवाली सराटीत नेमकं काय घडलं?

Manoj Jarange । maratha reservation : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधत मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांनी १७ सप्टेंबरपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला आठ दिवस झाले असून, आज उपोषणाचा नववा दिवस सुरु आहे. मात्र, अश्यातच त्यांची प्रकृती खालावल्याचे समोर आले आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली आहे.
मंत्री शंभुराज देसाई यांच्या आग्रहाने त्यांना रात्रीच्यावेळी सलाईन लावण्यात आले होते. पण आज दुपारी त्यांची तब्येत पुन्हा खालावली. यावेळी महिलांच्या डोळ्यातून अश्रुधारा येत होत्या. त्यांच्या टाहोमुळे वातावरण धीरगंभीर झाले. महिलांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. पण जरांगे पाटील त्यांच्या मागणीवर ठाम आहेत.
विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारला शेवटची संधी असल्याचे म्हणत मनोज जरांगे यांनी पुन्हा थेट इशारा देत शेवटचे अल्टिमेटम दिले. मनोज जरांगे यांच्या तीन प्रमुख मागण्या आहेत. मराठा आणि कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढा, मराठ्यांच्या कुणबी नोंदींवरून सगेसोयऱ्यांनाही आरक्षण द्या आणि हैद्रराबादसह सातारा संस्थान आणि बॉम्बे गॅझेट लागू करा. या प्रमुख मागणीसाठी त्यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
दरम्यान अंतरवाली सराटीत जरांगे पाटील यांची तब्येत घसरल्याने महिलांसह आबालवृद्ध भावुक झाले आहेत. जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्यासाठी महिलांनी त्यांना विनंती केली. त्यांनी यावेळी आक्रोश केला. महिलांना अश्रुधारा आवरता आल्या नाही. जरांगे पाटील यांनी पाणी प्यावे अशी विनंती त्यांना करण्यात आली. पण जरांगे आपल्या उपोषणावर ठाम असल्याचं दिसून येत आहे.





