Manoj Jarange : तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांवर जरांगे संतापले, थेट आरोग्यमंत्र्यांकडे निलंबनाची केली मागणी, नेमकं काय घडलं?

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानात गेल्या चार दिवसांपासून (२९ ऑगस्ट पासून) आमरण उपोषणाला बसलेले मराठा नेते मनोज जरांगे यांच्या प्रकृतीबाबत चिंता वाढली आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी (१ सप्टेंबर) त्यांची तब्येत खालावल्याने वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांचे पथक आझाद मैदानात दाखल झाले.
मात्र, जरांगे यांनी तपासणीला स्पष्ट नकार देत डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आणि सर्व डॉक्टरांना निलंबित करण्याची मागणी आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांच्याकडे केली आहे. “तुटलेल्या यंत्रांनी तपासणी करणारे डॉक्टर माणसं मारतील,” असा संताप व्यक्त करत जरांगे यांनी सरकारवरही मुद्दामहून निकृष्ट वैद्यकीय व्यवस्था पाठवल्याचा आरोप केला. या घटनेने मराठा आंदोलनाला नवे वळण मिळाले असून, आंदोलकांमध्येही संतापाची लाट उसळली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्टपासून अन्न-पाणी त्याग करून आझाद मैदानात उपोषण सुरू केले आहे. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून १०% आरक्षण मिळावे, या मागणीसाठी हजारो आंदोलक त्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत जमले आहेत. चार दिवसांच्या उपवासानंतर जरांगे यांची प्रकृती खालावली असून, रक्तदाब आणि साखरेची पातळी तपासण्यासाठी सरकारने डॉक्टरांचे पथक पाठवले. मात्र, तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांकडे असलेली यंत्रे तुटलेली आणि निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप जरांगे यांनी केला.
तपासणी करणारे डॉक्टर माणसं मारतील
जरांगे म्हणाले, “रक्तदाब तपासणीचं यंत्र चिंध्या बांधलेलं आणि तुटलेलं होतं. काल रक्तातील साखर तपासली तेव्हा त्यांच्या मशीनने ३० दाखवलं, तर आमच्या मशीनने ८६ दाखवलं. अशा तुटलेल्या यंत्रांनी तपासणी करणारे डॉक्टर माणसं मारतील. मुंबईसारख्या शहरात असे डॉक्टर आणि यंत्रे पाठवली जातात, हे लाजिरवाणं आहे.”
संतापलेल्या जरांगे यांनी डॉक्टरांच्या पथकाला परत जाण्यास सांगितले आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांच्याकडे सर्व डॉक्टरांना निलंबित करण्याची मागणी केली. “सरकार मुद्दाम अशा निकृष्ट यंत्रांसह डॉक्टर पाठवत आहे, जेणेकरून माझी प्रकृती खराब दाखवता येईल,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला.





