Maratha Reservation : मनोज जरांगेंनी मराठा समाजाची फसवणूक केली; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा गंभीर आरोप
Maratha Reservation : मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागणे यांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Maratha Reservation : अंतरवाली सराटी येथे २९ ऑगस्टपासून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनातून त्यांनी राज्य सरकारकडे विविध मागण्या केल्या असून, त्यातील काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. मराठा समाजाचा मोठा पाठिंबा मिळत असतानाच, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागणे यांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
मनोज जरांगे हे मराठा समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप सुनील नागणे यांनी केला आहे. तसेच, जरांगे यांच्या भूमिकेशी असहमती दर्शवत त्यांनी राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मराठा आरक्षण आंदोलनातील मतभेद आता अधिक स्पष्ट होताना दिसत आहेत.
५० टक्क्यांच्या मर्यादेत आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सुनील नागणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. “२०१४ साली पृथ्वीराज चव्हाण, त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि आता मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या कोपराला गुळ लावण्याचे काम करत आहेत,” अशी टीका त्यांनी केली आहे.
“५० टक्क्यांच्या आत आरक्षण द्या, या मागणीसाठी पुढील काळात जरांगे पाटील यांच्या भूमिकेशी विसंगत भूमिका घेत आम्ही राज्यभर आंदोलन छेडणार आहोत,” असे नागणे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. शिष्टमंडळाच्या आवाहनानंतर ते पाणी पिण्यासाठी आणि सलाईन घेण्यासाठी तयार झाले असले, तरी केवळ घोषणा न करता मागण्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे, या भूमिकेवर ते ठाम आहेत.
सरकारला त्यांनी ११ सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. या कालावधीत मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास थेट मुंबईत दाखल होण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी काळात मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Satara: अल्पवयीन मुलाकडून चाकू हल्ला साताऱ्यात हॉटेलमध्ये थरार; लघुटंकलेखक जखमी






