Mann Ki Baat : “नैसर्गिक आपत्तीचे घाव फक्त कुटुंबालाच नव्हे, तर संपूर्ण देशाला” – पंतप्रधान मोदी

Mann Ki Baat | Narendra Modi – वर्ष २०२५ च्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती देशाची परीक्षा घेत आहेत. गेल्या काही आठवड्यात आपण पूर आणि भूस्खलनाचा मोठा कहर पाहिला आहे. काही घरे उद्ध्वस्त झाली, काही शेते बुडाली, कुटुंबे उद्ध्वस्त झाली, पाण्याच्या वेगवान प्रवाहात पूल वाहून गेले, रस्ते वाहून गेले, लोकांचे जीवन धोक्यात आले. या घटनांनी प्रत्येक भारतीयाला दुःख दिले आहे. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबांचे दुःख हे आपल्या सर्वांचे दुःख आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
रविवारी (३१ ऑगस्ट) ते त्यांच्या ‘मन की बात’ रेडिओ कार्यक्रमाद्वारे लोकांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या गणेशोत्सवाचाही उल्लेख केला आणि स्वदेशी वस्तू वापरण्याचे आवाहन केले. मोदी पुढे म्हणाले की, जिथे जिथे संकट आले तिथे आमचे एनडीआरएफ-एसडीआरएफचे जवान, इतर सुरक्षा दल, सर्वांनी तिथल्या लोकांना वाचवण्यासाठी दिवसरात्र काम केले. सैनिकांनीही थर्मल कॅमेरे, लाईव्ह डिटेक्टर, स्निफर डॉग आणि ड्रोन सर्व्हिलन्स वापरत बचाव कार्य पूर्ण झाले. अनेकदा हेलिकॉप्टरने मदत साहित्य पोहोचवण्यात आले, जखमींना विमानाने हलवण्यात आले.
पुलवामा येथे डे-नाईट सामना
जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा येथील एका स्टेडियममध्ये विक्रमी संख्येने लोक जमले होते. पुलवामाचा पहिला डे-नाईट क्रिकेट सामना येथे खेळला गेला. पूर्वी हे अशक्य होते, पण आता माझा देश बदलत आहे. हा सामना ‘रॉयल प्रीमियर लीग’चा भाग आहे. त्यामध्ये जम्मू आणि काश्मीरमधील वेगवेगळे संघ खेळत आहेत. पुलवामामध्ये रात्री हजारोंच्या संख्येने इतके लोक, विशेषतः तरुण क्रिकेटचा आनंद घेत आहेत हे पाहणे खरोखरच एक दृश्य होते.
खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिव्हल
मोदी म्हणाले की, देशातील पहिला खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिव्हल श्रीनगरमधील दाल सरोवरात झाला. संपूर्ण भारतातील ८०० हून अधिक खेळाडूंनी त्यात भाग घेतला. महिला खेळाडूही मागे नव्हत्या, त्यांचा सहभागही जवळजवळ पुरुषांच्या बरोबरीचा होता. सर्वाधिक पदके जिंकणाऱ्या मध्य प्रदेशचे, त्यानंतर हरियाणा आणि ओडिशा यांचे विशेष अभिनंदन. ओडिशाच्या रश्मिता साहू आणि श्रीनगरच्या मोहसीन अली या दोन खेळाडूंशी मोदींनी संवाद साधला.
‘प्रतिभा सेतू’ चा विशेष उल्लेख
मोदी म्हणाले, जे विद्यार्थी यूपीएससी फार थोड्या फरकाने पास होऊ शकत नाहीत, अशा होनहार विद्यार्थ्यांसाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे आणि त्याचे नाव ‘प्रतिभा सेतू’ आहे. यूपीएससीच्या वेगवेगळ्या परीक्षांचे सर्व टप्पे उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा डेटा प्रतिभा सेतूमध्ये ठेवण्यात आला आहे. या पोर्टलवर अशा १० हजारांहून अधिक होनहार तरुणांचा डेटाबेस आहे. आता खासगी कंपन्या या पोर्टलवरून या होनहार विद्यार्थ्यांची माहिती मिळवू शकतात आणि त्यांना रोजगार देऊ शकतात.
मोदी म्हणाले की, बिहारच्या देवकी जी यांनी सौर पंपाने गावाचे भाग्य बदलले आहे. मुजफ्फरपूरच्या रतनपुरा गावातील रहिवासी असलेल्या देवकीला आता लोक प्रेमाने ‘सौर दीदी’ म्हणतात. देवकीजींचे जीवन सोपे नव्हते. ती एका बचत गटात सामील झाली आणि तिथे तिला सौर पंपाबद्दल माहिती मिळाली. तिने सौर पंपासाठी प्रयत्न सुरू केले आणि त्यात ती यशस्वी झाली. यानंतर सौर दीदींचा सौर पंप वाऱ्यासारखा पसरू लागला. जिथे पूर्वी फक्त काही एकर जमीन सिंचनाखाली येत होती, तिथे आता ४० एकरहून अधिक जमिनीला सोलर दीदींच्या सोलर पंपाने पाणी मिळत आहे.
अन्य क्षेत्रातील उल्लेखनीय…
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी प्रसिद्ध पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन याच्या कार्याला उल्लेख केला. मध्य प्रदेशातील शहडोलच्या खेळाडूंना त्यामुळे आता जर्मन प्रशिक्षक मिळणार आहे. सुरतमधील जितेंद्र सिंह राठोड हे भारतमातेच्या रक्षणासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या सर्व सैनिकांची माहिती गोळा करत आहेत. १५ सप्टेंबर हा भारताचे महान अभियंता मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा वाढदिवस आहे. आम्ही तो दिवस अभियंता दिन म्हणून साजरा करतो. अभियंते केवळ यंत्रे बनवत नाहीत, तर ते स्वप्नांना वास्तवात आणणारे कर्मयोगी आहेत.
१७ सप्टेंबर हा विश्वकर्मा जयंती आहे. हा दिवस आपल्या त्या विश्वकर्मा बांधवांना समर्पित आहे. तसेच सप्टेंबरमध्ये आपण हैदराबाद मुक्ती दिन देखील साजरा करू. हा तोच महिना आहे जेव्हा आपण ‘ऑपरेशन पोलो’मध्ये भाग घेतलेल्या सर्व वीरांच्या धाडसाचे स्मरण करतो. इटलीतील कॅम्प-रोटोंडी या छोट्या शहरात महर्षी वाल्मिकी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. कॅनडातील मिसिसॉगा येथे भगवान श्री राम यांच्या ५१ फूट उंच पुतळ्याचेही अनावरण करण्यात आले.





