Manikrao Kokate : अवकाळीच्या नुकसानीचे 8 दिवसात पंचनामे करा; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंनी दिले आदेश

नाशिक : राज्यातील अनेक भागांना मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. या अवकाळी पावसाचा अनेक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. उभी पिकं आडवी झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. अमरावती जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक 13 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. तर नाशिकमध्ये 5 हजार 800 हेक्टर क्षेत्र बाधित आहे. राज्यात फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे आठ दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले आहेत. कृषिमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती दिली. माणिकराव कोकाटे म्हणाले, महाराष्ट्रात सध्या खरीप आढावा बैठक होत आहेत. खरीप पेरणीला सामोरे जात असताना काही अडचण आहेत का याबाबत आढावा घेतला जात आहे.
दुसरीकडे अवकाळी पावसामुळे राज्यात 26 ते 27 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. सर्वाधिक नुकसान अमरावतीमध्ये झाले आहे. तात्काळ पंचनामे करून सरकारला पाठवण्याचे आदेश दिले आहेत. पंचनामे होत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. यावर बोलताना कृषिमंत्र्यांनी म्हटले की, शेतीचे नुकसान लगेच लक्षात येत नाही. दोन दिवस झाल्यानंतर लक्षात येईल. नुकसानीचे पंचनामे आठ दिवसांत पूर्ण होतील. शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीची मदत उशीरा मिळते, हे खरं आहे. मात्र लवकर मदत मिळण्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.





