राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यामुळे राज्यभरातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. अनेकांनी राज्यपाल कोश्यारी यांना महाराष्ट्रातून हटवण्याचीही मागणी केली होती. त्याचबरोबर भाजप पक्षाचे केंद्रातील मंत्री सुधांशु त्रिवेदी यांनी शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर भाजप पक्षावर मोठी टीका करण्यात आली. शिवरायांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्याचे राजकीय वातावरण शांत होऊ लागले असतानाच आता पुन्हा भाजपच्या नेत्याने शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य करून वादाला आणखी पेटवले आहे.
प्रतापगड किल्ल्यावर आयोजित शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमानिमित्त बोलताना भाजप नेते मंगल प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीतील सुटकेशी केल्यामुळे आता एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. लोढा यांच्या वक्तव्याला विरोधी पक्षांकडून मोठा विरोध सुरु झाला असून राष्ट्रवादीचे आमोल कोल्हे यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. लोढा यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी असल्याचं कोल्हे यांनी म्हटले आहे.
वादग्रस्त वक्तव्यावर लोढा यांचे स्पष्टीकरण
या सगळ्या प्रकरणानंतर आता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्वतःच स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की,”मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली नाही. तर जो आग्रा भेटीवेळी प्रसंग घडला याची तुलना केली. केवळ त्या प्रसंगातील साधर्म्य दाखवण्याचा माझा प्रयत्न होता.” लोढा यांनी त्यांच्या वक्तव्याचे स्पष्टीकरण जरी दिले असले तरी राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वारंवार होत असलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.
काय म्हणाले होते नेमकं लोढा
भाजप नेते आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेची तुलना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी केली. प्रतापगडावर ‘शिवप्रताप’ दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना डांबून ठेवले होते परंतु स्वराज्यासाठी ते बाहेर पडले आणि देशात स्वराज्याची स्थापना करू शकले… तसेच मुख्यमंत्री शिंदेंना देखील रोखण्याचे प्रयत्न झाले परंतु महाराष्ट्रासाठी ते देखील बाहेर पडले म्हणून आज उल्हास आहे”.