मुंबई – प्रतापगड किल्ल्यावर आयोजित शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमानिमित्त बोलताना भाजप नेते मंगल प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीतील सुटकेशी केल्यामुळे आता एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. यावर आता राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. लोढा यांनी केलेली तुलना दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
मंगलप्रभात लोढा यांनी केलेली तुलना दुर्दैवी आहे. मुळात एक महत्वाची गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नव्हती,नाही आणि नसेन असं खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणालेत. एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी लोढा यांनी केलेल्या विधानाबाबत आपलं मत व्यक्त केलं. तसेच लोढा यांनी ज्या प्रसंगाचा दाखल दिला त्याबाबतचा काही फरक सांगताना कोल्हे म्हणाले, शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून ज्यावेळी सुटले त्याआधी त्यांनी स्वराज्य निर्माण केलं होत. नंतर येऊन केलं नाही, त्यामुळे मंत्री महोदयांनी आपला इतिहास तपासावा असं स्पष्ट मत कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केलं.
आग्र्याच्या कैदेतील सुटका ही महाराजांनी स्वतःच्या स्वार्थासाठी,पदासाठी केलेली नव्हती ती रयतेच्या राज्यासाठी केलेली होती. जर तुम्हाला शिवरायांशीच तुलना करायची असेल तर ज्या महाराजांनी रयतेच्या भाजीच्या देठालाही धक्का लागू देऊ नका ये आज्ञापत्र लिहिलं त्याच महाराजांच्या महाराष्ट्रातील अतिवृष्ट शेतकरी न्यायासाठी टाहो फोडतोय त्याच्यासाठी आपण काय करतोय ? प्रतीकांची तुलना करू नका त्यातील विचार घेण्याचा प्रयत्न करा असही अमोल कोल्हे यावेळी म्हणाले.
काय म्हणाले होते नेमकं लोढा
भाजप नेते आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेची तुलना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी केली. प्रतापगडावर ‘शिवप्रताप’ दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. “औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना डांबून ठेवले होते परंतु स्वराज्यासाठी ते बाहेर पडले आणि देशात स्वराज्याची स्थापना करू शकले… तसेच मुख्यमंत्री शिंदेंना देखील रोखण्याचे प्रयत्न झाले परंतु महाराष्ट्रासाठी ते देखील बाहेर पडले म्हणून आज उल्हास आहे”. लोढा यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.