Mamata Banerjee : महाराष्ट्राच्या राजकारणाची पुनरावृत्ती होणार? ममता बॅनर्जींचे 16 खासदार नॉट रिचेबल
पश्चिम बंगालमध्ये सत्ता गमावल्यानंतर ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेसला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये सत्ता गमावल्यानंतर ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेसला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यात ५८ आमदारांनी आधीच स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर, आता दिल्लीत टीएमसीच्या संसदीय पक्षात मोठी फूट पडण्याची तयारी पूर्ण झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पुढील आठवड्याच्या सुरुवातीलाच हा राजकीय ‘बॉम्ब’ फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ममता बॅनर्जी दिल्लीत असतानाच होणार ‘गेम’?
पुढील आठवड्याच्या सुरुवातीला तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee)आणि अभिषेक बॅनर्जी हे ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीत येणार आहेत. त्या नेमक्या दिल्लीत असतानाच तृणमूलचे किमान २२ खासदार बंडाचे निशाण फडकवण्याच्या तयारीत आहेत. हे बंडखोर खासदार स्वतःलाच ‘खरी टीएमसी’ म्हणून घोषित करू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
या संभाव्य बंडखोर गटाचे नेतृत्व बारासातच्या ज्येष्ठ खासदार काकोली घोष दस्तीदार करणार असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे या गटामध्ये लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहांच्या खासदारांचा समावेश आहे.
भाजप नेत्यांचे दिल्लीत ठिय्या; ‘टीएमसी आता भूतकाळ’
या वेगवान राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य सध्या दिल्लीत तळ ठोकून आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना समिक भट्टाचार्य यांनी या परिस्थितीवर सूचक वक्तव्य केले. ते म्हणाले, “आम्हाला सध्या सतत फोन येत असून तृणमूलचे अनेक खासदार आमच्या संपर्कात आहेत. तृणमूल काँग्रेस आता भूतकाळात जमा झाली आहे.” भाजप नेत्यांच्या या विधानामुळे बंगालच्या राजकारणात पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू असल्याच्या वृत्ताला बळ मिळाले आहे.
अपात्रतेपासून वाचण्यासाठी आकड्यांचे गणित काय?
घटनेच्या दहाव्या अनुसूचीनुसार (पक्षांतर बंदी कायदा) संसदेत अधिकृत फूट मान्य होण्यासाठी आणि अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी बंडखोर गटाला एकूण सदस्यसंख्येच्या दोन-तृतीयांश (२/३) बहुमताची आवश्यकता आहे.
लोकसभेचे गणित : हाजी नुरुल इस्लाम यांच्या निधनानंतर सध्या लोकसभेत टीएमसीचे २८ सदस्य आहेत. त्यामुळे पक्षांतर बंदी कायद्यातून वाचण्यासाठी बंडखोरांना किमान १९ लोकसभा सदस्यांची गरज आहे.
राज्यसभेचे गणित : राज्यसभेत पक्षाचे १३ सदस्य असून, तिथे बंडखोरांना किमान ९ राज्यसभा सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या दोन्ही सभागृहे मिळून एकूण २२ खासदार या बंडखोर गटात सामील झाले आहेत. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी हे खासदार सोमवारी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे सभापती सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेण्याची दाट शक्यता आहे. या भेटीत ते स्वतःलाच ‘खरी तृणमूल काँग्रेस’ म्हणून मान्यता देण्याची मागणी करू शकतात.
सुखेंदु शेखर राय यांच्याकडून वृत्ताला दुजोरा
तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार सुखेंदु शेखर राय यांनीही या राजकीय घडामोडींना दुजोरा दिला आहे. “ही फूट आता अटळ असून तो केवळ वेळेचा प्रश्न आहे,” असे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले. तसेच पक्षाच्या १६ पैकी १५ खासदारांचे फोन सध्या बंद असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या बंडखोर खासदारांमध्ये मनोरंजन क्षेत्रातील काही प्रसिद्ध चेहरे, माजी खेळाडू आणि पहिल्यांदाच संसदेत निवडून आलेल्या खासदारांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
थोडक्यात काय तर महाराष्ट्राच्या राजकारणात ज्याप्रमाणे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडून दोन गट निर्माण झाले, अगदी तशाच प्रकारच्या नाट्यमय घडामोडींची पुनरावृत्ती आता पश्चिम बंगालच्या राजकारणातही होताना दिसत आहे. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या राजकीय संकटाचा सामना कसा करतात, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.






