Mallikarjun Kharge : मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदींची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी केली तुलना; म्हणाले…

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यपद्धतीची तुलना केली. सिंग यांच्या कार्यकाळात जेवढे काम झाले; त्याच्या १० टक्केही काम मागील ११ वर्षांत झाले नाही, अशी शाब्दिक टोलेबाजी त्यांनी केली. सिंग यांच्या समवेत कार्य करण्याची संधी मला मिळाली. ते बोलायचे कमी; पण काम जास्त करायचे. त्याउलट, आजचे पंतप्रधान बोलतात जास्त; काम जरा कमी करतात. संसद अधिवेशनावेळी सिंग नेहमी उपस्थित असायचे. ते प्रश्नांची उत्तरे द्यायचे अन् विरोधकांच्या टिप्पणींवर प्रतिसाद द्यायचे.
आजचे पंतप्रधान तसे करण्याला अवमान मानतात. शिक्षणानंतर नेते बनणाऱ्यांना अधिक ज्ञान असते. ते अधिक काम करतात. ते प्रचाराकडे अधिक लक्ष देत नाहीत, असे खर्गे म्हणाले. अखिल भारतीय प्रोफेशनल्स कॉंग्रेसने डॉ.मनमोहन सिंग फेलोशिप प्रोग्रॅम सुरू केला आहे. त्या प्रोग्रॅमच्या उद्धाटन प्रसंगी खर्गे बोलत होते. सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारचा कार्यकाळ म्हणजे परिवर्तनाचे वेगळे युग होते. त्यावेळी कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली प्रोफेशनल्सचे मोठे सहकार्य लाभले. त्यातून माहिती अधिकार कायदा, मनरेगा, शिक्षणाचा अधिकार, अन्नसुरक्षा, वनाधिकार यांसारखी ऐतिहासिक पाऊले उचलली गेली.
वर्ष २००८ मध्ये जागतिक मंदीची स्थिती होती. मात्र, सिंग यांनी त्या स्थितीचा परिणाम भारतावर होऊ दिला नाही. देशाचा विकास दर सरासरी ८ टक्के इतका राहिला. त्याच सुमारास आधार कार्डवर काम सुरू झाले. त्यानंतर वर्ष २०१४ पर्यंत निम्म्यापेक्षा अधिक ग्रामीण कुटूंबांची बँक खाती सुरू झाली. सिंग यांच्या कार्यकाळात डिजिटल क्रांती, थेट लाभ हस्तांतर आदींचा पाया रचला गेला. शेतकऱ्यांना ७० हजार कोटी रूपयांची कर्जमाफी देण्यात आली. मात्र, आज शेतकऱ्यांची स्थिती बिकट बनली आहे, अशा शब्दांत खर्गे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.





