Anjali Damania | सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सातत्याने आपली भूमिका मांडली आहे. सुरुवातीपासूनच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अंजली दमानिया यांच्याकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. अखेर संतोष देशमुख यांचे हत्येचे फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला. आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर अंजली दमानियांनी हल्लाबोल केला आहे. दमानिया यांनी धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहआरोपी करावे, अशी मागणी केली आहे. अंजली दमानिया यांनी म्हटले की, “संतोष देशमुख हत्या प्रकरण असो किंवा खंडणी हे सर्वकाही धनंजय मुंडे यांना माहिती होते आणि त्यांचाच बंगल्यावर याबद्दलची मिटिंगही झाली होती. धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर झालेल्या मिटिंगमध्ये दोन पोलिस अधिकारी देखील उपस्थित होते. पण आरोपपत्रात याचा उल्लेख नाही. याबद्दलच्या कॉपी मी उज्वल निकम यांना देणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत का? जर मुख्यमंत्री विधान करत असतील की, माहिती मिळेल तेव्हा करु, पण तुम्ही त्या दिशेने कामच केलं नाही. चौकशी झाली नाही, तर सीडीआर त्यांचे सीसीटीव्ही स्टेटमेंट, टॉवर लोकेशन येणारच नाही, तपास होणार कसा?” असा सवालही त्यांनी केला. Anjali Damania | बालाजी तांदळेसह पोलीस अधिकाऱ्यांचा आरोपपत्रात समावेश नाही “धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता बालाजी तांदळे हा संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांनी आम्ही सर्व आरोपींना शोधले, असे सांगत होता. त्याने कोणाला सांगितले की, आरोपींना शोधण्यासाठी आमच्या 60-70 गाड्या फिरत होत्या. तर धनंजय देशमुख यांना तांदळेने सांगितले की, आमच्या 200 गाड्या आरोपींच्या शोधासाठी फिरत होत्या. मात्र, सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात बालाजी तांदळे आणि संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश नाही. त्यांचा सहआरोपी केले पाहिजे,” अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली. Anjali Damania | धनंजय मुंडेंसह 10 जणांना सहआरोपी करण्याची मागणी “संतोष देशमुख यांचे वाल्मिक कराडच्या सहकाऱ्यांनी अपहरण केले हे माहिती असूनही एलसीबीचे अधिकारी गीते यांनी काहीच केले नाही. जे पोलीस अधिकारी होते, ज्यांनी प्रचंड मदत केली, त्यांचं कोणाचही नाव त्यामध्ये नाही. कोणाचही स्टेटमेंट चार्जशीटमध्ये नाही, 200 लोकांची यादी आहे. राजेश पाटील, महाजन, गीते म्हणून अधिकारी होते, जे खंडणीच्या दिवशी उपस्थित होते, त्यांचं कोणाचही स्टेटमेंट, नाव यामध्ये नाही. त्यामुळे धनंजय मुंडे, बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे, सारंग आंधळे, डॉ. वायबसे आणि त्यांची पत्नी,एसपी बारगळ, पीएसआय राजेश पाटील, पीआय भागवत शेलार, पीआय महाजन आणि गीते एलसीबीचे अधिकारी 10 जणांना सहआरोपी करुन जबाब नोंदवा,” अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली. दरम्यान, सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या आईबद्दल एक विधान केले. ज्यानंतर धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला होता. Anjali Damania | हेही वाचा: अमेरिका ‘या’ सर्वात शक्तिशाली लष्करी संघटनेतून बाहेर पडणार? युरोपचे कारण देत इलॉन मस्क म्हणाले…