निर्णय घ्या, अन्यथा राज्यभर बेमुदत बंद; आरक्षणप्रश्नी अखिल भारतीय मराठा महासंघाचा सरकारला इशारा

पुणे -“जालना येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनकर्त्यांनी निर्णयासाठी सरकारला दोन दिवसांचा अवधी दिला आहे. दोन दिवसांत सरकाने निर्णय घेतला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात बेमुदत बंद पुकारण्यात येईल,’ असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप यांनी सोमवारी दिला.
यावेळी महासंघाचे उपाध्यक्ष संतोष नानवटे, राज्य संपर्क प्रमुख अनिल ताडगे, शहर सरचिटणीस मयूर गुजर आणि राजेंद्र पासलकर उपस्थित होते. जगताप म्हणाले, “सरकारच्या वतीने ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. ते तिथे गोड गोड बोलले. पण, सरकार काही करत नाही. भाजपविरोधाची लाट राज्यात निर्माण झाली आहे.
जर आरक्षण देणार असेल, तर ते केवळ ओबीसीमधूनच दिले जाऊ शकते. त्यामुळे सरकारने येत्या दोन दिवसांत यासंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा. तसेच गृहमंत्री यांनी केवळ माफी न मागता तातडीने राजीनामा द्यावा. अन्यथा संपूर्ण बेमुदत राज्यात बंदची हाक देण्यात येईल.’





