Prakash Ambedkar : “राज्यात आलेले बहुमत हे ईव्हीएमचे”; प्रकाश आंबेडकरांची टीका, कॉंग्रेसवरही साधला निशाणा

Prakash Ambedkar – महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आणि सत्ता देखील स्थापन केली. यावरून महाविकास आघाडी तसेच इतर पक्षांनी देखील ईव्हीएम घोटाळा झाला असल्याचा आरोप केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील ईव्हीएमवर शंका उपस्थित केली असून राज्यात आलेले बहुमत हे ईव्हीएमचे असल्याची टीका केली आहे.
आंबेडकर म्हणाले, ईव्हीएमविरोधात आम्ही आंदोलन सुरू केले आहे. निवडणूक आयोगाला पत्र लिहून मतदानाच्या दिवशी सायंकाळी 6 नंतर झालेल्या मतदानाचे डिटेल्स मागितले आहेत. आयोगाच्या उत्तराची वाट पाहात आहोत. मारकडवाडी सारखी परिस्थिती गावागावात आहे, गावागावात रोष आहे.
मारकडवाडी येथील गावकऱ्यांचा बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या निर्णयाला अडवण्याचा सरकार किंवा पोलिसांना आधिकार नाही. सरकारने मारकडवाडी येथील ग्रामस्थांना अडवल्याने संशय बळवतो की यांनी गडबड केली आहे, अशी प्रतिक्रिया आंबेडकरांनी दिली आहे.
आंबेडकर पुढे म्हणाले, काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी मारकडवाडी या गावातील मतदान थांबाविण्याचा आदेश दिला होता का? याबाबत एकनाथ शिंदे यांनी खुलासा करावा. वेळ मिळाला तर मी मारकडवाडीला जाणार आहे. मी अनेकदा म्हटले की हे ईव्हीएम पूर्वी काँग्रेसकडून पाडण्यासाठी वापरले जात होते. आता हे भाजपकडून निवडणुका जिंकण्यासाठी वापरले जात आहे. सर्वोच्च न्यायालायचे न्यायाधीश ईव्हीएमचा मुद्दा बघायला तयार नाहीत.
पुढे बोलताना आंबेडकरांनी कॉंग्रेस पक्षावर देखील टीका केली आहे. ते म्हणाले, संविधान खतरे में नाही तर काँग्रेस पक्ष खतरे में है. काँग्रेसने आम्हाला बाहेर का ठेवले? याचा पहिल्यांदा खुलासा करावा. आम्ही भाजप सोबत कधीही समझोता करणार नाही, हे आम्ही ठरवले असल्याचे देखील यावेळी आंबेडकरांनी स्पष्ट केले आहे.





