Maharashtra Police Transfers : “महाराष्ट्र पोलीस दलात मोठी उलथापालथ ! 50 हून अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोण कुठे?

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आले आहेत. गृह विभागाने 50 हून अधिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, यामध्ये पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, कोल्हापूर, लातूर, गडचिरोली, भंडारा, अहमदनगर यासह राज्यातील विविध जिल्ह्यांतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या खांदेपालटमुळे पोलीस दलात नवे जोश आणि कार्यक्षमता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रमुख बदल्यांचा तपशील :
लातूर: अमोल तांबे यांची लातूरचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स: निकेश खाटमोडे पाटील यांची या विभागातून बदली करण्यात आली आहे.
पुणे : तेजस्विनी बाळासाहेब सातपुते यांची पुण्याच्या शस्त्र निरीक्षण शाखेतून राज्य राखीव पोलीस बल (रा. रा. पोलीस बल) गट क्रमांक 1 मध्ये समादेशकपदी बदली. अश्विनी सानप यांची पुण्याच्या लोहमार्ग पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती.
नवी मुंबई : संजय वाय जाधव यांची रा. रा. पोलीस बल गट क्रमांक 11 मध्ये समादेशकपदी बदली.
मुंबई : शीतल झगडे यांची दहशतवाद विरोधी पथकाच्या (ATS) पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती.
भंडारा : निलेश मोरे यांची अपर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती.
अहमदनगर : वैभव कुलबुर्गे यांची अपर पोलीस अधीक्षकपदी नेमणूक.
गडचिरोली : गोकुळ राज जी यांची अपर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती.
या बदल्या निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत. गृह विभागाने या बदल्यांद्वारे राज्यातील संवेदनशील भागात अनुभवी आणि कणखर अधिकाऱ्यांना नियुक्त केले आहे. विशेषतः दहशतवाद विरोधी पथक आणि नक्षलग्रस्त गडचिरोलीसारख्या क्षेत्रात नव्या नियुक्त्यांमुळे सुरक्षा व्यवस्थेला बळकटी मिळण्याची शक्यता आहे.
गृह विभागाने बदल्यांचे आदेश तातडीने लागू केले असून, नव्या नियुक्त्या त्वरित प्रभावी होतील. या फेरबदलांमुळे पोलीस दलातील कार्यप्रणालीत सुसूत्रता येईल आणि आगामी निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, असा विश्वास गृह विभागाने व्यक्त केला आहे. या बदल्यांमुळे स्थानिक पातळीवरील राजकीय आणि सामाजिक समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





