Maithili Thakur: मैथिली ठाकूरच्या निवडणुकीत उतरण्याच्या चर्चांवर वडिलांची प्रतिक्रिया – “मी पलायन करणाऱ्या पहिल्या तुकडीतील…”

पटना – भजन व लोकसंगीतासाठी देश-विदेशात प्रसिद्ध झालेल्या गायिका मैथिली ठाकूरच्या बिहार विधानसभा निवडणुकीत उतरू शकण्याच्या चर्चांवर आता त्यांच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. जबलपूर येथे मंगळवारी माध्यमांशी बोलताना मैथिलींचे वडील रमेश ठाकूर यांनी मुलीच्या राजकारणात येण्याच्या शक्यतेचं स्वागत केलं आणि सांगितलं की, “जर असं झालं तर मला खूप आनंद होईल.”
रमेश ठाकूर यांनी सांगितलं की, त्यांचं कुटुंब हे बिहारमधून पलायन करणाऱ्या सुरुवातीच्या कुटुंबांपैकी एक होतं. ते म्हणाले, “मी 30 वर्षांपूर्वी बिहार सोडलं. त्या काळात राज्यात जातीय संघर्ष खूप वाढला होता. लालू यादव सत्तेत आल्यानंतर परिस्थिती बिघडू लागली आणि त्यामुळे आम्हाला राज्य सोडावं लागलं.”
एएनआयशी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं, “बिहारमधून पलायनाची सुरुवात झाली तेव्हा आम्ही पहिल्या बॅचमध्ये होतो. 1995 मध्ये मी तिथून बाहेर पडलो आणि गेली 30 वर्षं बिहारच्या बाहेरच आहे.”
#WATCH | Jabalpur, MP: On reports of folk and devotional singer Maithili Thakur contesting Bihar elections, her father Ramesh Thakur says, “…We are the first batch of people who migrated from Bihar. One reason is the spread of caste frenzy there. I left in 1995, and I have been… pic.twitter.com/QG6UKnqZVl
— ANI (@ANI) October 7, 2025
जीवनाचा प्रवास सांगताना ते म्हणाले, “मला संगीताचं ज्ञान होतं, त्यामुळे मी लोकांना गाणं शिकवू लागलो आणि तसंच स्वतःचं स्थान निर्माण केलं. हळूहळू कुटुंब वाढलं, आणि आज मुलांनी स्वतःचं नाव कमावलं आहे.”
राज्य सोडण्यामागील कारण सांगताना रमेश ठाकूर म्हणाले, “लालू यादवांच्या काळात ब्राह्मणांवर हल्ले वाढले, शेतांवर बेकायदेशीर कब्जे होऊ लागले आणि खोटे गुन्हे दाखल होऊ लागले. आम्ही त्यावेळी 20-25 वर्षांचे तरुण होतो, त्यामुळे त्या परिस्थितीचा आम्हाला जास्त परिणाम झाला आणि अखेर आम्हाला पलायन करावं लागलं.”
ते पुढे म्हणाले, “बिहारमधून जे लोक पलायन करून गेले, त्यांची आतापर्यंत कुणीही विचारपूस केलेली नाही. त्या दिशेने काही काम झालं पाहिजे, जेणेकरून बाहेर गेलेले लोक पुन्हा बिहारमध्ये परत येऊन काम करू शकतील.”
त्यांनी पुढे नमूद केलं की, “1995 मध्ये सुरू झालेलं पलायन आजही सुरूच आहे. मात्र एनडीए सरकार आल्यानंतर बिहारमध्ये काही प्रमाणात विकास झाला आहे आणि परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली झाली आहे. आता गरज आहे की कुशल लोकांनी बिहारमध्ये परत येऊन राज्याच्या विकासासाठी काम करावं.” संवादाच्या शेवटी रमेश ठाकूर म्हणाले, “सध्या बिहारमध्ये एनडीए व्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही.”





