कोलकाता – कालीमातेसंबंधात वादग्रस्त विधाने करून अडचणीत आलेल्या तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांना त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षा आणि प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट नाव न घेता जाहीर समज दिली आहे. काही बोलण्याच्या अगोदर लोकांच्या भावना समजून घेणे गरजेचे असते, असे त्यांनी म्हटले आहे. महुआ यांच्या मतांशी तृणमूलने आणि ममता यांनी अगोदरच फारकत घेतली असल्यामुळे महुआ आता अडचणीत आल्या आहेत.
ममता म्हणाल्या की, मला वाटते काही वेळा आपण उगाचच नकारात्मक मुद्द्यावर वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. रोज काही चांगली कामेही होत आहेत. मात्र, प्रसार माध्यमांचे त्याकडे लक्ष जात नाही. ते नकारात्मक बाबींकडे लक्ष देतात. चांगली कामे पाहात नाहीत आणि अचानक ओरडायला सुरुवात करतात. काही चुका झाल्या असतील. त्या दुरूस्त केल्या जातील. मात्र, त्याकडे लक्ष दिले जात नाही. काम केले तरच त्यात चूक होते. ती सुधारता येते. मात्र, ओरडायचे कशाला, असा सवाल करत त्यांनी माध्यमांनाच पिंजऱ्यात उभे केले.
माघार घेण्यास महुआ मोईत्रा यांचा नकार
कालीमातेशी संबंधित वक्तव्यामुळे प्रचंड वाद निर्माण झाला असतानाही माघार घेण्यास तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी नकार दिला आहे. मरेपर्यंत आपण आपल्या त्या वक्तव्याचे समर्थन करत राहू, असे त्यांनी म्हटले आहे.
ज्या भारतात भारतीय जनता पार्टीचा पितृसत्ताक ब्राह्मणवादी दृष्टिकोन हावी राहील आणि बाकीचे नागरिक धर्माच्या आसपासच घुटमळत राहतील, अशा भारतात राहण्याची आपली मुळीच इच्छा नसल्याचे विधानही त्यांनी केले आहे. महुआ यांच्या विरोधात कोलकातातील कृष्णनगर या त्यांच्या मतदारसंघात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय जनता पार्टीच्या एका आमदाराने त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तसेच मध्य प्रदेशातील भोपाळ येथेही त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या राज्यात भाजपचे सरकार आहे.