Mahhi Vij : माहीच्या वीजच्या आयुष्यात नव्या व्यक्तीची एन्ट्री?

टीव्ही विश्वातील आदर्श जोडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जय भानुशाली आणि माही विज यांच्या १५ वर्षांच्या सुखी संसाराला आता पूर्णविराम मिळाला आहे. गेल्या आठवड्यात (४ जानेवारी २०२६) या दोघांनीही सोशल मीडियावरून अधिकृतपणे घटस्फोट घेतल्याचे जाहीर केले. त्यांनी संयुक्त निवेदनात सांगितले की, “आम्ही वेगळे होत आहोत, पण आमच्यात कोणताही द्वेष किंवा नकारात्मकता नाही. आम्ही शांततेला प्राधान्य देतो आणि मुलांसाठी (तारा, खुशी, राजवीर) सर्वोत्तम पालक, मित्र राहू.” हे ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.
मात्र, या धक्क्यातून चाहते सावरत असतानाच, माही विजने १० जानेवारी २०२६ रोजी (शनिवार) आपल्या इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली. तिने आपला जवळच्या मित्र नदीमच्या वाढदिवसानिमित्त केक कापतानाचा फोटो पोस्ट केला. कॅप्शनमध्ये माहीने लिहिले, “वाढदिवसाच्या शुभेच्छा त्या व्यक्तीला ज्याला मी नशिबाने नव्हे तर हृदयाने निवडलं आहे. जो मला न बोलता सर्व काही समजून घेतो… तू माझं कुटुंब आहेस, तू माझी सुरक्षित जागा आहेस.
या पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडाली. विशेषतः माही आणि जय यांच्या मुलगी तारा भानुशालीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर झालेल्या फोटोंमुळे चर्चा अधिक तीव्र झाली. ताराने नदीमसोबतच्या प्रेमळ फोटोसह कॅप्शन लिहिले, “हॅपी बर्थडे अब्बा! मी तुमच्यावर खूप खूप खूप प्रेम करते… तुमची तारा.” या फोटोत नदीम ताराला कडेवर घेऊन दिसत आहे.”जय भानुशाली असताना हा ‘अब्बा’ कोण?”, “घटस्फोटाच्या जखमा ताज्या असताना इतकी घाई का?” अशा संतापजनक आणि टीकात्मक कमेंट्स या पोस्टवर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नदीम हा सलमान खान टेलिव्हिजन (SKTV) चा सीईओ आणि मीडिया प्रोफेशनल आहे. तो जय-माहींचा जुना आणि जवळचा मित्र आहे. जय-माही एकत्र असतानाही नदीमचा त्यांच्या घरात नियमित वावर होता. गेल्या वर्षीही ‘फादर्स डे’ निमित्त ताराने नदीमसाठी इमोशनल पोस्ट शेअर केली होती. माहीच्या कठीण काळात नदीम तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, पण त्याला ‘अब्बा’ म्हणणे अनेकांना खटकले.
या वादावर जय भानुशालीने मौन बाळगले आहे. जय आणि माहीने आपल्या घटस्फोटाचं कारण स्पष्ट केलं नसलं तरी, १५ वर्षांचं नातं संपल्यानंतर अवघ्या ७ दिवसांत दुसऱ्या व्यक्तीला ‘फॅमिली’ आणि ‘सिक्योर प्लेस’ म्हणणं हे अनेकांच्या पचनी पडल्याचे दिसत नाही आहे.





