Mahavitaran News : महावितरणच्या कार्यालयांची पुनर्रचना ; नोव्हेंबरपासून होणार कायमस्वरूपी अंमलबजावणी

प्रभात वृत्तसेवा
पुणे – महावितरणकडून थेट ग्राहकसेवा देणाऱ्या उपविभाग व शाखा कार्यालयांच्या केलेल्या पुनर्रचनेनंतर त्यांच्या कामाला १ तारखेपासून सुरुवात झाली. त्यानंतर महिन्याभरात कामाकाजाचा आढावा घेऊन या पुनर्रचनेचा मसुदा अंतिम करत १ नोव्हेंबरपासून ही पुनर्रचना कायमस्वरूपी पद्धतीने लागू केली जाईल. तोपर्यंत वीजग्राहकांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून आवश्यक उपाययोजना करण्याचे अधिकार परिमंडलाच्या मुख्य अभियंत्यांना दिल्या आहेत.
महावितरणच्या उपविभाग व शाखा कार्यालयांद्वारे नवीन वीजजोडणी, मासिक वीजबिल, सुरळीत वीजपुरवठ्यासाठी वीज यंत्रणेची नियमित देखभाल, तांत्रिक बिघाडांची दुरुस्ती, थकबाकी वसुली, वीजहानी कमी करणे आदी कामे करण्यात येतात. त्यामुळे अभियंते व तांत्रिक कर्मचाऱ्यांना एकाच वेळी १० ते १२ प्रकारची कामे करावी लागतात. ही रचना सुमारे २५ वर्षांपूर्वीची आहे व त्या वेळच्या ग्राहक संख्येनुसार करण्यात आली होती.
या जुन्या रचनेचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर आणि ग्राहकसेवेवर होत आहे. त्यामुळे हा ताण कमी करण्याची मागणी होत होती.या नव्या प्रारूपात थेट ग्राहकसेवा देणाऱ्या उपविभाग व शाखा कार्यालयांची पुनर्रचनेवर भर देत शहरी, ग्रामीण व दुर्गम भागांतील ग्राहक संख्या व भौगोलिक क्षेत्रानुसार संबंधित उपविभाग व शाखा कार्यालयांची फेररचना करण्यात आली आहे. सोबतच ग्राहक संख्येनुसार अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे.
नव्या कार्यालयांची निर्मिती..
राज्यात आणखी २ विभाग कार्यालय, ३७ उपविभाग आणि ३० शाखा कार्यालयांची नव्याने निर्मिती करण्यात आली आहे. आता विभागीय देखभाल व दुरुस्ती पथकाची निर्मिती केली आहे. या १० सदस्यीय पथकात अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. प्रत्येक विभागात सध्या अस्तित्वात सर्व उपविभागांचे महसूल व देयके, तसेच देखभाल व दुरुस्ती अशी विभागणी झाली आहे.

