Maharashtra Weather : महाराष्ट्रमध्ये हवामानात अचानक बदल होत असून उकाड्यानंतर आता अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने सोमवारी आणि मंगळवारी राज्यातील काही भागांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. एकूण ११ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून शेतकरीवर्गात चिंता वाढली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांत तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी उकाडा वाढला असून उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. अशा परिस्थितीत अचानक अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त झाल्याने शेती पिकांवर परिणाम होण्याची भीती आहे. सोमवारी या जिल्ह्यांत पावसाची शक्यता सोमवारी अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी कोसळू शकतात. मंगळवारीही इशारा कायम मंगळवारी सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव येथे ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. याशिवाय चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत काही भागांत विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, शुक्रवारी नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्यांत अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. जोरदार सरींमुळे कांदा, गहू आणि इतर रब्बी पिकांना फटका बसण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. अवकाळी पावसाच्या या अंदाजामुळे बळीराजा धास्तावला असून पुढील काही दिवस हवामानातील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.