Maharashtra Weather – राज्यात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, गेल्या २४ तासांत कमाल तापमानात एक ते दोन अंशांनी वाढ झाली. परिणामी बुधवारी (दि. १२) राज्यातील अमरावती येथे हंगामातील उच्चांकी ४२.२, तर अकोला येथे ४२ आणि जळगाव जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. अमरावती, अकोला, चंद्रपूर यासह पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम आहे. राज्यातील वाढत्या तापमानामुळे कोकण-गोव्यासह विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसांपासून उष्णतेच्या लाट आली आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्याच आठवाड्यात उन्हाचा झळा असह्य करत असून, तापमानाचा वाढता पारा असाच सुरू राहिला, तर यंदाचा उन्हाळा तीव्र तापदायक ठरणार असे दिसते. गेल्या २४ तासांत कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठाड्यातील कमाल तापमानात एक ते दोन अंशांनी वाढ झाली. त्यामुळे अमरावती आणि अकोला जिल्ह्यात पारा ४२ अंशांच्या पुढे, तर चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, जळगाव येथील पारा ४० अंशांच्या पुढे नोंदविला आहे. एकीकडे उन्हाचा चटका वाढत असताना पुढील दोन दिवसांत विदर्भासह मराठवाड्यात मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात वाढत्या कमाल तापमानात काही अंशी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पुढील दोन दिवस पुण्यात कोरडे हवामान शहरासह जिल्ह्यात आज पुन्हा कमाल तापमानात एक ते दीड अंशाने वाढ झाल्यामुळे ३८ अंशांपर्यंत खाली आलेला उष्णतेचा पारा चाळीशीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. बुधवारी (दि. १२) लोहगाव येथे सर्वाधिक ३९.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली, तर शिवाजीनगर, वडगावशेरी, कोरेगाव पार्क, हवेली आणि चिंचवड परिसरात कमाल तापमान ३८ अंशाच्या पुढे गेले आहे. त्यामुळे आज दुपारपासून उन्हाचा चटका अंगाची लाहीलाही करत होता. पुढील दोन दिवस शहरातील हवामान कोरडे राहील. तर दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.