Maharashtra Weather Update : राज्यात सध्या बदलत्या हवामानाचा प्रभाव कायम असून अनेक भागांत पाऊस, वादळी वारे आणि गारपीट होत आहे. भारतीय हवामान विभाग यांनी गुरुवारीही राज्यातील विविध भागांना पावसाचा इशारा दिला आहे. मात्र, याचसोबत पुढील दोन दिवसांत कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे, त्यामुळे उकाडाही वाढणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पश्चिमी विक्षोभामुळे राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची नोंद होत आहे. कोल्हापूर आणि पुणे परिसरातही अलीकडेच पावसाची नोंद झाली. या हवामान बदलामुळे शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. गुरुवारी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. यात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक घाट विभाग, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या भागांचा समावेश आहे. तर कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांसाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. यात ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे. दरम्यान, मुंबईत सकाळी ढगाळ वातावरण आणि गार वारे जाणवत असले तरी दुपारच्या वेळी उष्णता आणि आर्द्रतेमुळे उकाडा वाढत आहे. शहरात कमाल तापमान सुमारे ३२ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील दोन दिवस राज्यात पावसाळी वातावरण कायम राहण्याची शक्यता असून एप्रिल महिन्यात अंतर्गत भागांमध्ये तापमानात आणखी वाढ होण्याचे संकेत हवामान अभ्यासकांनी दिले आहेत.