Maharashtra Rain : राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
Maharashtra Rain : गडचिरोली, चामोर्शी आणि सिरोंचा या तीन तालुक्यांतील सर्व शाळा, महाविद्यालये तसेच अंगणवाड्यांना आज सुट्टी जाहीर

Maharashtra Rain : राज्यात संपूर्ण जुलै महिन्यात दमदार पाऊस झाला. यातच आता 30 ते 31 जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. या कालावधीत विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागानुसार, कोकणातील सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, जळगाव, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर घाटमाथा, परभणी, हिंगोली आणि जालना येथे विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.
येलो अलर्ट – मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, लातूर, बुलढाणा, अमरावती, अकोला, भंडारा, वर्धा, नागपूर, वाशिम आणि यवतमाळ.
ऑरेंज अलर्ट – गोदिंया, गडचिरोली आणि चंद्रपूर.
बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे पावसाचा जोर वाढल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. राज्यात पुढील 5 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसानही झाले आहे.
शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्यांना आज सुट्टी जाहीर
दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गडचिरोली, चामोर्शी आणि सिरोंचा या तीन तालुक्यांतील सर्व शाळा, महाविद्यालये तसेच अंगणवाड्यांना आज सुट्टी जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे गडचिरोली नगर परिषदेचे पटांगण पूर्णतः पाण्याखाली गेली असून चामोर्शी मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
तर भंडारा जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पावसाला हजेरी लावली. गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस पडल्यानं धापेवाडा आणि पुजारीटोला धरणातून करण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदी पात्रात झाला. त्यामुळं वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे.
हेही वाचा:






