मुंबई : राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित युवा संघर्ष निर्धार परिषदेच्या निमित्ताने शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, प्रहारचे बच्चू कडू आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर हे एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. रविवारी (दि. २०) होणाऱ्या या परिषदेत हे तीन नेते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी सदर परिषदेविषयी पत्रकार परिषदेत माहिती दिली. पक्षाचे अध्यक्ष जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त ही परिषद आयोजित केली आहे. युवा अवस्थेत जानकर यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे राज्यात एक नवी चळवळ उभी राहिली. तसेच हे तीनही नेते सर्वसामान्य कुटुंबातील असून, ते परिषदेत युवकांना संदेश देतील. दरम्यान, विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. सध्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीकडून कोणत्याही पक्षाला विरोधी पक्षनेतेपद देखील देण्यात आलेले नाही. त्यामुळे कुठेतरी विरोधकांची ताकद कमी झाल्याचे बोलले जात असतानाच विरोधकांची कमी झालेली स्पेस घेण्यासाठी महाराष्ट्रातील 3 मातब्बर नेते एकत्रित येणार आहेत. राज्याच्या राजकारणामध्ये महायुती, महाविकास आघाडीनंतर वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग महाराष्ट्रातील राजकारणात पाहायला मिळाला.