Maharashtra Politics : काँग्रेसने डाव टाकला! विधानपरिषदेसाठी पहिला उमेदवार जाहीर
विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा (Maharashtra Politics) उद्या शेवटचा दिवस असल्याने राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे.

Maharashtra Politics : विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा (Maharashtra Politics) उद्या शेवटचा दिवस असल्याने राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाच्या जोरदार चर्चांनंतर अखेर चित्र स्पष्ट झाले आहे.
महाविकास आघाडीच्या जागावाटपात (Maharashtra Politics) काँग्रेसच्या वाट्याला ८ जागा आल्या असून, पक्षाने आपला पहिला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून काँग्रेसने एका तरुण आणि नव्या चेहऱ्याला संधी देत धक्कातंत्राचा वापर केला आहे.
काँग्रेसकडून युवा नेत्याला संधी
धाराशिव-बीड-लातूर हा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा भक्कम बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. या मतदारसंघातून माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी सलग तीन वेळा विजय मिळवला होता. हाच जुना गड पुन्हा मिळवण्यासाठी काँग्रेसने यंदा पहिल्याच प्रयत्नात जिल्हा परिषद निवडणुकीत बाजी मारणारे युवा नेते महेश देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रविवारी महेश देशमुख यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. या संदर्भातील अधिकृत माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे. महेश देशमुख हे सोमवारी (उद्या) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे.
मतदारसंघातील पक्षीय बलाबल
धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य मतदारसंघात एकूण 904 मते आहेत. त्यामध्ये भाजप 301, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 68, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 138 असे एकूण 537 सदस्य महायुतीचे आहेत तर काँग्रेस 155, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 32, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 54 असे एकूण 241 सदस्य महविकास आघाडीचे आहेत. त्याशिवाय अपक्ष 25, छोटे पक्ष व विविध आघाडीचे 78 मतदानाचा अधिकार आहे. त्यामुळे याठिकाणी महायुतीचा उमेदवार सहज निवडून येऊ शकतो.
भाजपचा उमेदवार कोण? दिल्ली दरबारी ‘या’ 4 नावांची चर्चा!
संख्याबळाच्या जोरावर हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाणार हे निश्चित आहे, मात्र अद्याप भाजपचा उमेदवार अधिकृतपणे जाहीर झालेला नाही. भाजप सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उमेदवारीसाठी ४ प्रमुख नेत्यांची नावे दिल्ली हायकमांडकडे पाठवण्यात आली आहेत:
१. बसवराज पाटील (माजी मंत्री व लातूर जिल्हा भाजप अध्यक्ष)
२. दत्ता कुलकर्णी (धाराशिव जिल्हा भाजप अध्यक्ष)
३. अरविंद पाटील-निलंगेकर (माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू)
४. ओमप्रकाश शेटे (बीड जिल्हा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माजी स्वीय सहाय्यक व विश्वासू सहकारी)
दिल्ली दरबारी या चार नावांवर रविवारी रात्रीपर्यंत एकमत होऊन कोणत्याही क्षणी भाजप उमेदवाराची (Maharashtra Politics) घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसच्या महेश देशमुखांविरुद्ध भाजप कोणाला मैदानात उतरवणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.






