IAS Transfer : राज्य सरकारने प्रशासकीय फेरबदल अंतर्गत ६ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांना विविध जिल्ह्यांचे पालक सचिव म्हणून नव्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. यामध्ये राज्याचे मुख्य सचिव राजेश अगरवाल यांची गडचिरोली जिल्ह्याचे पालक सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांची परभणी जिल्ह्याचे पालक सचिव म्हणून नेमणूक झाली आहे. पालक सचिवांची भूमिका महत्त्वाची असते. प्रत्येक जिल्ह्यासाठी नेमलेले पालक सचिव शासकीय धोरणे, कल्याणकारी योजना आणि प्रशासकीय सुधारणांची प्रभावी अंमलबजावणी करतात. ते प्रलंबित बाबी तातडीने सोडवतात, जिल्ह्यात वर्षातून किमान ४ वेळा (३ महिन्यांनी एकदा) दौरा करतात, योजनांचा आढावा घेतात, अडचणी ओळखून उपाय सुचवतात आणि अहवाल सादर करतात. यापूर्वी एकनाथ शिंदे सरकारने राज्यातील ३६ जिल्ह्यांसाठी पालक सचिव नेमले होते. आता प्रशासकीय कारणांमुळे काही बदल करण्यात आले आहेत. नव्या पालक सचिवांच्या नियुक्त्या गडचिरोली : मुख्य सचिव राजेश अगरवाल (पूर्वी मिलिंद म्हैसकर, अप्पर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग) वर्धा : मिलिंद म्हैसकर (पूर्वी अनुपकुमार यादव, सचिव, महिला व बालविकास विभाग) मुंबई शहर : मनिषा वर्मा, अ.मु.स., कौशल्य, रोजगार, नाविन्यता व उद्योजगता विभाग (पूर्वी इकबाल सिंह चहल, जे ३१ मार्च २०२६ रोजी सेवानिवृत्त होत आहेत) परभणी : तुकाराम मुंढे, सचिव, दिव्यांग कल्याण विभाग (पूर्वी दिपक कपूर, अपर मुख्य सचिव, जलसंपदा विभाग) वाशिम : किरण कुलकर्णी, सचिव, मराठी भाषा विभाग (पूर्वी गणेश पाटील, सचिव, मृद व जलसंधारण विभाग) रत्नागिरी : आप्पासो धुळाज, सचिव, इतर मागास व बहुजन कल्याण विभाग (पूर्वी सीमा व्यास, अपर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग व विशेष चौकशी अधिकारी-१) तुकाराम मुंढे हे २००५ बॅचचे IAS अधिकारी असून, त्यांनी यापूर्वी सोलापूर जिल्हाधिकारी, नाशिक व नागपूर महापालिकांच्या आयुक्तपदी काम केले आहे. त्यांची शिस्तबद्ध प्रशासकीय शैली नेहमीच चर्चेत राहिली आहे. हा फेरबदल राज्यातील शासकीय योजनांची अधिक प्रभावी अंमलबजावणी आणि प्रशासकीय गती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरेल.