Maharashtra Politics : “….तर एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंना सोडून गेले नसते”, ‘या’ भाजप नेत्याची खोचक टीका

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या हालचालींना मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. ५ डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानात नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावणार आहेत. यादरम्यान उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली. त्यांच्या या टीकेला आता भाजप नेते प्रसाद लाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले प्रसाद लाड?
सध्या देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर अनेक बैठका पार पडत आहे. या बैठकीनंतर प्रसाद लाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. “आतापर्यंत ड्रमगेट ते मेनगेट आणि मेनगेट तू ड्रमगेटच्या बाहेर उद्धव ठाकरे गेलेले नाहीत. मुख्यमंत्री झाल्यानंतर मंत्रालयात ते फक्त तीन वेळा गेले. फेसबुक लाईव्हवर त्यांनी सरकार चालवलं.
आता उफाळलेलं प्रेम आधी उफाळले असते तर एकनाथ शिंदे सोडून गेले नसते. सातत्याने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी वाईट वागणूक दिली. म्हणून हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन आमदार बाहेर पडले. आता उरलेले आमदार बाहेर पडतील म्हणून हा केविलवाणा प्रयत्न आहे”, अशा शब्दात प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत भाजप शिंदेना गोंजारेल. निवडणुकीत हेतू साध्य झाल्यानंतर भाजप जे करायचेय ते शिंदेंच्या बाबतीत करेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) आव आणून त्याखाली भाजपने वेगवेगळ्या यंत्रणा राबवल्या. आरएसएस फक्त पत्रकं वाटाण्यापुरती होती. सध्या सुरु असलेल्या सत्तास्थापनेत एकनाथ शिंदे यांच्या मागे दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती आहे. भाजपला मुंबई महानगरपालिका जिंकायची आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.





