Maharashtra CM : शपथविधी सोहळ्याकडे विरोधकांनी फिरवली पाठ; ठाकरे, पवारांना भाजपाने सुनावलं

Maharashtra Assembly Election 2024 । Keshav Upadhye : महाराष्ट्र राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते ‘देवेंद्र फडणवीस’ यांनी काल (दि. ५) मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तर एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडला.
या शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह देशभरातील अनेक दिग्गज नेते आणि कलाकार या सोहळ्याला उपस्थित होते.
मात्र, या सोहळ्याकडे विरोधकांनी पाठ फिरवल्याचं दिसून आलं. आता यावरुनच भाजपाने विरोधकांवर निशाणा साधला आहे. भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी विरोधकांवर शपथविधी सोहळ्यातील अनुपस्थितीवरुन सुनावलं आहे.
हिच तर महाराष्ट्रविरोधी कोती मनोवृत्ती
काल आझाद मैदानावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून @Dev_Fadnavis यांचा तर @mieknathshinde व @AjitPawarSpeaks यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. या समारंभापासून व्यक्तीगत आमंत्रण देऊनही @uddhavthackeray @PawarSpeaks व कॅाग्रेसचे नेते…
— Keshav Upadhye (@keshavupadhye) December 6, 2024
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले की, ‘हिच तर महाराष्ट्रविरोधी कोती मनोवृत्ती, काल आझाद मैदानावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा तर एकनाथ शिंदे व अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. या समारंभापासून व्यक्तीगत आमंत्रण देऊनही उद्धव ठाकरे आणि शरद पवार व कॅाग्रेसचे नेते गैरहजर राहिले.
हा लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचा शपथविधी होता. लोकशाहीत लोकांनी दिलेला कौल स्वीकारून है नेते शपथविधी ला आले असते तर खरंच या नेत्यांना महाराष्ट्र हिताची व संविधानाची चाड आहे असा अर्थ निघाला असता. महाराष्ट्राचा विकासासाठी आम्ही एक आहोत असा संदेश दिला गेला असता.
२०१९ मध्ये उध्दव ठाकरे यांनी लोकांचा विश्वासघात करीत मविआसोबत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा त्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस व तत्कालिन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते. त्यापूर्वीची उदाहरणे आहेत.
निवडणुका संपल्या आता विकासासाठी आपण एक आहोत हा संदेश देता आला असता. मात्र पक्षीय स्वार्थापलीकडे आम्ही काहीच पाहू शकत नाही, महाराष्ट्राच्या हिताचा कोरड्या गप्पा मारतो व वेळ आली तर विरोधातच हेच या निमित्ताने या मंडळींनी दाखवून दिले. या आशयाची पोस्ट त्यांनी केली आहे.





