मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात (Maharashtra Cabinet) स्थान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सहा महिन्यांपूर्वी संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी ‘राजकीय बेरोजगार’ असल्याचे सांगत हाताला काम देण्याचे आर्जव केले होते. आता त्यांना लवकरच मंत्रीपदाची शपथ मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, शिवसेना (शिंदे गट) नेते तानाजी सावंत यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. धनंजय मुंडेंचे मंत्रिमंडळात कमबॅक ? बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर ‘मोका’ (MCOCA) अंतर्गत कारवाई झाली होती. या प्रकरणामुळे मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे त्यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन होईल, अशी शक्यता कोणीही गृहित धरली नव्हती. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे बदलली आहेत. जानेवारी २०२६ पर्यंत या निवडणुका घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असून, या निवडणुका २०२९ च्या विधानसभा निवडणुकींसाठी पायाभरणी ठरणार आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यासारख्या प्रभावी नेत्याला मंत्रिमंडळाबाहेर ठेवणे राष्ट्रवादी काँग्रेसला परवडणारे नाही, असा निष्कर्ष पक्षनेतृत्वाने काढल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी यात पुढाकार घेतला असून, मुंडे यांना मंत्रिमंडळात परत आणण्याचा निर्णय पक्का झाल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पुढील आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेरबदल होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी नरहरी झिरवळ यांना मंत्रिमंडळातून वगळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तानाजी सावंत यांनाही संधी? शिवसेना (शिंदे गट) नेते तानाजी सावंत यांचेही मंत्रिमंडळात पुनरागमन होण्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना महायुती सरकारमध्ये सावंत यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याची जबाबदारी होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत भूम-परांडा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतरही त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नव्हते, ज्यामुळे त्यांची नाराजी उघड झाली होती. आता त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी एका विद्यमान मंत्र्याला वगळावे लागणार आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकीय समीकरणांचा खेळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकींच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. धनंजय मुंडे आणि तानाजी सावंत यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे महायुती सरकारमधील अंतर्गत गटबाजी आणि समतोल साधण्याचे प्रयत्नही दिसून येत आहेत. या मंत्रिमंडळ फेरबदलामुळे कोणत्या नव्या राजकीय समीकरणांना चालना मिळेल, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.