मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? कोणाला मिळणार संधी? मंत्री देसाईंनी दिली माहिती, म्हणाले “कोर्ट केसेसच्या..”

मुंबई – एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर पडल्याचे समजते. अगोदर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. त्यानंतर महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागणार असल्याचे समजते. मात्र, मंत्री शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या विधानाचा हवाला देत, लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी शक्यता वर्तवली आहे.
अवघ्या एका वर्षावर लोकसभेच्या निवडणुका आल्यात. त्यातच नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. हे पाहता केंद्रात मंत्रिमंडळ विस्तार होणार, अशा चर्चा रंगल्यात. काही दिवसांपूर्वी किरेन रिजीजू यांच्याकडून खाते काढून घेण्यात आले. त्याच धर्तीवर मोदी सरकारच्या नाकात नाहक दम आणणाऱ्या आणि वादग्रस्त मंत्र्यांना आगामी विस्तारात डच्चू मिळू शकतो. या विस्तारानंतरच राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त लागणार असल्याचे समजते.
मंत्री देसाई यावेळी म्हणाले की, आमदार, मंत्री, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मंत्रिमंडळ विस्तारावर बोलण्याचा अधिकार नाही. हे सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आहेत. दोघांनीही वेळोवेळी मंत्रिमंडळ विस्तार लवकर करू असे सांगितले आहे. त्यामुळे आम्हालाही वाटते आहे, कोर्ट केसेसच्या ज्या काही अडचणी होत्या, त्या दूर झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल.
कोणाला मिळणार संधी?
आगामी मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला संधी मिळावी यासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाकडून अनेकांनी पाण्यात देव ठेवलेत. त्यात आमदार संजय शिरसाट यांना मंत्रिपद मिळणार का? हे पाहावे लागेल. त्यांनी भाजपमुळेच मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर होत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. दुसरीकडे प्रहार संघटनेचे बच्चू कडू, आमदार रवी राणा यांच्यासह अनेकांना मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. शिवसेनेच्या शिंदे गटानेही आपली यादी तयार ठेवली असल्याचे समजते.




