Maharashtra Assembly Election 2024 : पवार-ठाकरेंमध्ये नुरा कुस्ती सुरू ! CM योगींनी कॉंग्रेसलाही धरलं धारेवर

Yogi Adityanath । Maharashtra Assembly Election 2024 – काँग्रेसचे इंग्रजांच्या फोडा आणि राज्य करा नीतिप्रमाणे जातीजातींमध्ये भांडणे लावण्याचे धोरण आहे. काँग्रेसला देव, देश आणि धर्म याबद्दल आस्था नाही, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची केली.
महाविकास आघाडीत पवार आणि ठाकरेंमध्ये नुरा कुस्ती सुरू असून ते स्वत:ला आणि देशाला धोका देतील, असा घणाघातही योगी आदित्यनाथ यांनी केला. ते कोल्हापूर येथे आयोजित प्रचारसभेत बोलत होते.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांसाठी कोल्हापूर शहरात प्रचार सभा पार पडली. या सभेत बोलताना योगी आदित्यनाथ यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला.
काँग्रेससाठी कधी देश महत्वाचा वाटला नाही. युपीए सरकारच्या काळात देशात दहशतवाद वाढला होता. 2014 च्या आधी पाकिस्तानचे अतिरेकी कधीही देशात घुसायचे, हल्ले करायचे.
पण मोदी पंतप्रधान झाल्यानंतर हे सर्व बंद झाले. हा नवीन भारत आहे कुणी छेडले तर सोडत नाही. हम बटे थे तब अपमान सहन करना पडता था, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.
काँग्रेसचा इतिहासच देशाला धोका देण्याचा आहे. काँग्रेस नसती तर देशाचे दोन तुकडे झाले नसते, आज पाकिस्तान नसता. काँग्रेसच्या गुदगुल्याने आज पाकिस्तान आहे. अयोध्येत कॉंग्रेसही राममंदिर बांधू शकली असती. परंतू त्यांनी ते बांधले नाही, अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी केली.
पुढे बोलताना योगी आदित्यनाथ यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी कधी काँग्रेस बरोबर आघाडी केली असती का? पण उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब यांच्या विचारांना बाजूला सारून काँग्रेसबरोबर आघाडी केली. बाळासाहेब ठाकरे यांचे राजकारण सिद्धांतांवर आधारित होते. परंतू उद्धव ठाकरे या सगळ्यापासून दूर गेले, असे आदित्यनाथ म्हणाले.
धार्मिक मिरवणुकींवर दगडफेक होणार नाही
राज्यात पुन्हा महायुती सत्तेवर आल्यानंतर मग गणपती बाप्पाच्या मिरवणुकीवर, रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक करणारे घरात बसतील. कारण त्यांना माहीत आहे जर दगडफेक केली राम नाम सत्य है हे उत्तर प्रदेशचे सूत्र त्यांना लागू होईल. महायुती सत्तेवर आल्यावर विशाळगडावरील अतिक्रमणेही आपोआप निघतील, असेही योगी यावेळी म्हणाले.





