Maharashtra Assembly Election 2024 : ‘बटेंगे तो कटेंगे’ला अजित पवारांचा विरोध; देवेंद्र फडणवीस थेट म्हणाले…

Maharashtra Assembly Election 2024 | Batenge toh katenge : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून तो प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे. या दरम्यान, अनेक ठिकाणी भाजप नेते आणि कार्यकर्त्यांकडून ‘बटेंगे तो कटेंगेच्या’ घोषणा दिल्या जात असल्याचं पाहायला मिळत आहे. यावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेला विरोध केला होता. अजित पवार म्हणाले की, “अशा गोष्टी महाराष्ट्रात अजिबात चालणार नाही. आमच्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा चालते.
त्यांनी शिकवलेल्या गोष्टी आमच्या रक्तात आहेत आणि आम्ही त्याच मार्गावर जाऊ. ही विचारधारा कुणी सोडली तर महाराष्ट्र त्याचा स्वीकार करणार नाही,” असे अजित पवार म्हणाले होते.
मात्र, आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना या घोषणेचा अर्थ लक्षात आला नाही, असा टोला लगावला आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेचा अर्थ अजित पवारांच्या लक्षात आला नाही. जनभावना अजितदादांच्या लक्षात आली नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
देशाचा इतिहास काय सांगतो. या देशात जेव्हा-जेव्हा आमचा समाज जातींमध्ये वाटला गेला, प्रांतात वाटला गेला. किंवा विविध कारणांनी वाटला गेला तेव्हा आम्ही गुलामीत गेलो. देशही कटला, समाजही कटला आणि व्यक्तीही कटला.
त्यामुळं ते सातत्याने सांगतात की हे जे राजकारण चाललं आहे. जातीजातींमध्ये विभाजन करण्याचे, यापासून सावध राहा. एकत्र राहिलो तर शक्ती आहे, वाटलो गेलो तर संपावं लागेल. याला चांगल्या शब्दांत मोदींनी सांगितलं आहे की ‘एक है तो सेफ है’ ,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
पंकजा मुंडे काय म्हणाल्या? पाहा…
योगी आदित्यनाथ यांची अनेक प्रचारसभांमध्ये दिलेली ‘बटेंगे तो कटेंगे’ राजकीय वर्तुळ आणि सामान्य नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. या अनुषंगाने पंकजा मुंडे यांना एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला.
तेव्हा पंकजा मुंडे यांनी म्हटले की, “राज्यात अशा घोषणांची गरज नाही. त्याऐवजी विकासावर बोलायला पाहिजे. मी भाजपमध्ये आहे म्हणून ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेचे समर्थन करणार नाही. माझी काम करण्याची पद्धत वेगळी आहे,” असे पंकजा मुंडे यांनी म्हटले.
पंकजा पुढे म्हणाल्या की, “योगी आदित्यनाथ यांनी ही घोषणा त्यांच्या राज्यामध्ये वेगळ्या संदर्भासाठी दिली होती. मोदीजींनी ‘एक हैं तो सेफ हैं’ असा नारा दिला असला तरी तो वेगळ्या संदर्भाने आहे. पंतप्रधानांनी जात-धर्म न पाहात सर्वांना समान न्याय दिला आहे.” असं त्या म्हणाल्या आहेत.





