Maharajswa Abhiyan – सामान्य नागरिकांना शासकीय कामांसाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, तर ‘शासनच जनतेच्या दारी’ यावे या हेतूने आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ शिबिर राजगड तालुक्यातील करंजावणे येथे उत्साहात पार पडले. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या संकल्पनेतून आणि भोरचे उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात केवळ कागदपत्रांची देवाणघेवाण झाली नाही, तर अनेक कुटुंबांच्या समस्यांचे जागेवरच निराकरण करण्यात आले. करंजावणे येथील पार्वती मंगल कार्यालयात आंबवणे विभागासाठी हे शिबिर घेण्यात आले. यावेळी राजगडचे तहसीलदार निवास ढाणे यांनी प्रास्ताविकात प्रशासनाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचवणे हेच प्रशासनाचे प्रथम कर्तव्य असून, त्यादृष्टीने हे पाऊल उचलले आहे. यावेळी जि. प. सदस्य तानाजी मांगडे व अमोल नलावडे, पंचायत समिती सदस्य संदीप खुटवड, सुवर्णा राऊत व सीता खुळे, माजी जि.प. सदस्य आनंद देशमाने , राष्ट्रवादी काँग्रेस राजगड तालुका अध्यक्ष किरण राऊत यांच्यासह आंबवणे सर्कल मधील सर्व सरपंच व उपसरपंच सहभागी झाले. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन जेव्हा एकत्र येते, तेव्हा विकासकामांचा वेग कसा वाढतो, याचे हे उत्तम उदाहरण ठरले. शिबिराचे सर्वात मोठे यश म्हणजे ११७ अधिवास (डोमासाईल) दाखले आणि ३७ उत्पन्न दाखल्यांचे प्रत्यक्ष जागेवरच वाटप करण्यात आले. रेशन कार्डमधील बदल असोत वा ७/१२ वरील वारस नोंदी, प्रत्येक टेबलवर अधिकारी आणि कर्मचारी तत्परतेने सेवा देत होते. प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. अंबावणे परिसरातील ग्रामस्थांनी या उपक्रमाचे जोरदार स्वागत केले. “तालुक्याच्या गावाला जाण्यासाठी लागणारा वेळ आणि खर्च आता वाचला असून, साहेबांनी स्वतः गावात येऊन आमचे प्रश्न सोडवले, हे खूप कौतुकास्पद आहे,” अशा भावना वृद्ध आणि महिलांनी व्यक्त केल्या. शिबिराची वैशिष्ट्ये: -महसूल क्रांती: फेरफार निर्गतीसह ६७ नवीन ७/१२ उताऱ्यांचे वाटप. -आरोग्य सेवा: ३२ नागरिकांची बीपी-शुगर तपासणी करून मोफत आरोग्य सल्ला. -संजय गांधी निराधार योजना: गरजूंना आधार देण्यासाठी नवीन अर्जांची छाननी करून प्रमाणपत्रे प्रदान.