Mahalunge accident : खड्ड्यामुळे 11 वर्षीय विराजचा बळी; अपघातानंतर महाळुंगेत रस्त्यांची डागडुजी सुरू
Mahalunge accident :

Mahalunge accident : महाळुंगे परिसरातील रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकी घसरून झालेल्या भीषण अपघातात ११ वर्षीय विराज संदीप पाटोळे याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी (दि. १७) घडलेल्या या घटनेमुळे महाळुंगे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रस्त्यांची दुरवस्था आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
विराज हा त्याचे वडील संदीप पाटोळे यांच्यासोबत दुचाकीवरून जात होता. त्यावेळी रस्त्यावरील खड्ड्यातून दुचाकी गेल्याने ती अचानक घसरली. या दुर्घटनेत विराज दुचाकीवरून रस्त्यावर पडला. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या मुलाचा अपघात डोळ्यादेखत झाल्याने वडील संदीप पाटोळे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.
महाळुंगे परिसरातील रस्त्यांची दुरवस्था गेल्या काही काळापासून नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नाही. त्यातच या रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असल्याने दुचाकीस्वारांसाठी परिस्थिती अधिक धोकादायक बनली आहे.
काही दिवसांपूर्वीच महाळुंगे ग्रामस्थांनी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आंदोलन केले होते. आंदोलन करूनही परिसरातील अनेक रस्त्यांवरील खड्डे कायम असल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही रस्त्यांच्या दुरुस्तीला गती मिळत नसल्याने अखेर या दुरवस्थेचा एका निष्पाप मुलाला जीव गमावून फटका बसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
अपघातानंतर प्रशासनाची धावपळ
दरम्यान, विराजच्या अपघाती मृत्यूनंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून, आज सकाळपासूनच महाळुंगे परिसरात रस्त्यांच्या डागडुजीची कामे सुरू करण्यात आली आहेत. विविध ठिकाणचे खड्डे बुजविणे तसेच रस्त्याशी संबंधित इतर कामांना प्रशासनाने सुरुवात केली आहे. त्यामुळे कालपर्यंत दुर्लक्षित असलेल्या रस्त्यांच्या प्रश्नाकडे अपघातानंतरच प्रशासनाने तातडीने लक्ष दिल्याचे चित्र दिसून येत आहे.
अपघातानंतर अवघ्या काही तासांत रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू झाल्याने, हा वेग यापूर्वीच दाखविला असता तर विराजसारख्या निष्पाप मुलाचा जीव वाचला असता का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रस्त्यांची डागडुजी केवळ तात्पुरती न करता कायमस्वरूपी आणि दर्जेदार पद्धतीने करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
महाळुंगे परिसराचा झपाट्याने विकास होत असून, वाहनांची संख्या आणि वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, त्याप्रमाणात रस्त्यांची देखभाल आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना होत नसल्याने अपघाताचा धोका कायम आहे. त्यामुळे प्रशासनाने संपूर्ण परिसरातील रस्त्यांचे सर्वेक्षण करून धोकादायक खड्डे तातडीने बुजवावेत, रस्त्यांची आवश्यक त्या ठिकाणी पुनर्बांधणी करावी आणि अवजड वाहतुकीच्या मार्गांवर सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
एका निष्पाप ११ वर्षीय विराजचा जीव गेल्यानंतर तरी प्रशासनाला कायमस्वरूपी जाग येणार का, की काही दिवसांनी पुन्हा रस्त्यांची अवस्था ‘जैसे थे’ होणार? असा संतप्त सवाल महाळुंगेकरांकडून उपस्थित केला जात आहे.
“काही दिवसांपूर्वी आम्ही महाळुंगे ग्रामस्थांनी एकत्र येऊन रस्ते दुरुस्तीसाठी आंदोलन केले होते. परंतु त्यानंतरदेखील परिसरात अनेक ठिकाणी खड्डे तसेच आहेत. आज या खड्ड्यांमुळे एका निष्पाप मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. महाळुंगे परिसरातील रस्त्यांच्या विकासासाठी येथील शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळाला नसतानाही आपल्या जमिनी रस्त्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु प्रशासनाकडून या ठिकाणी कोणत्याही प्रकारे अपेक्षित कामे करण्यात आलेली नाहीत. आता तरी या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला जाग येईल का? महाळुंगे परिसरातील रस्त्यांचा विकास न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने पुन्हा मोठे आंदोलन उभारण्यात येईल,” असा इशारा स्थानिक नागरिक निलेश पाडाळे यांनी दिला.





